मुंबई : शिवसेना ही दुतोंडी सापासारखी आहे, बोलते एक आणि करते एक. मात्र लोक आता मुर्ख राहिलेले नाहीत, अशा कडक शब्दात भारिप बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचाही प्रकाश आंबेडकर यांनी समाचार घेतला. उद्वव ठाकरेंनी राम मंदिर बांधायला मुंबईतूनच विटा घेऊन जाव्यात, असा टोला आंबेडकर यांनी लगावला.
आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीबरोबर जाणार नसल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं.आम्ही भाजप आणि आरएसएसविरोधात लढा उभा केला आहे. ज्यात चार जीव गेले आहेत. त्यामध्ये आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, असंही आंबेडकर यांनी म्हंटलं आहे.
नोटाबंदीच परिणाम आता जाणवत आहे. नॉन बँकिंग सेक्टर प्रचंड अडचणीत आलं आहे. हाऊसिंग इंडस्ट्रीमध्ये 56 लाख कामगार आहेत. त्यातील लाखो कामगार आज घरी बसले आहेत, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
रिझर्व्ह बँकेचा नॉन बॅकिंग सिस्टिमवर कंट्रोल नाही. त्यामुळे शासनाने यामधून तोडगा काढला पाहिजे. बँकेमध्ये मध्यमवर्गीयांचा पैसा आहे. हाय एंडेड बॉन्ड व्यापाऱ्यांना विकण्यास आमचा विरोध आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास काही दिवसांत आर्थिक आणीबाणी येईल. त्यानंतर पाकिस्तानबरोबर सर्जिकल स्ट्राईक केला जाईल आणि यामधून लक्ष विचलित केलं जाईल, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर हल्लाबोल केला.