मुंबई : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह समीर, पंकज आणि इतरांना मंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने मनी लाँड्रिंग प्रकरणात तूर्तास दिलासा दिला आहे.


ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राच्या संदर्भात ईडीने वैयक्तिक हमीवर भुजबळ यांना 6 ऑगस्टपर्यंत दिलासा दिला. 6 ऑगस्टला पीएमएलए कोर्ट यावर आपला निकाल देणार आहे.

भुजबळ यांची नाशिक येथील 25 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. त्याच्या आधारे ईडीने पीएमएलए कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल केलंय. ईडीने हे पुरवणी आरोपपत्र दाखल केलं असून त्याचा विचार स्वतंत्र गुन्हा असा करता येणार नाही, असा बचाव छगन भुजबळ यांच्या वतीने करण्यात आला.

या प्रकरणात नवी माहिती आल्यावर प्रत्येक वेळी जामिनाकरता बाँड देणं कायदेशीररित्या योग्य ठरणार नाही, असाही भुजबळांच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला.

एकाच गुन्ह्याकरता दोनदा अटक करता येणार नाही. कायद्याच्या मूलभूत तत्वाचीदेखील आठवण भुजबळांच्या वकिलांनी कोर्टाला करुन दिली. तर ईडीने आपण पुरवणी आरोपपत्र दाखल केल्याचं मान्य केलं, पण त्याची दखल वेगळा गुन्हा म्हणून करण्याची विनंती ईडीने कोर्टाला केली.

यावर कोर्टाने 6 ऑगस्टला या प्रकरणाचा निकाल देणार असल्याचं स्पष्ट करत तूर्तास भुजबळ कुटुंबीयांसहित इतरांनाही दिलासा दिला आहे.