मुंबई : "जनमत हे सरकारविरोधात चाललं आहे, त्यामुळे आता कामाला लागा," असा आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला आहे. मुंबईत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची बैठक पार पडली. त्यावेळी झालेल्या भाषणात पवारांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार राहण्यास सांगितलं.


"जिथे भाजपची सत्ता आहे तिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात. त्यामुळे त्या दृष्टीने तयारीला लागा,"असं आवाहन शरद पवारांनी केलं.

कर्जमाफी जाहीर केली, मग निकषाची भानगड कशाला?
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुनही शरद पवारांनी राज्य सरकारावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी जर सरसकट कर्जमाफी जाहीर केली असेल तर निकष नावाची भानगड कशाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

गरीब वर्ग आत्महत्येच्या मार्गावर
देशातले उद्योग आज बंद पडायला लागले आहेत. गरीब वर्ग नाराज आहे. शेतकरी आत्महत्या करतोय. तर आता तळागाळातला गरीब वर्गही त्याच मार्गाने जातो की काय याची भीती वाटतेय, असं पवार म्हणाले.

जपानची आर्थिक मंदी कमी करण्यासाठी भारतात बुलेट ट्रेन
सामान्य माणूस ज्यातून प्रवास करतो त्यामधील यातना कमी करण्यासाठी प्रयत्न होत नाही. पण बुलेट ट्रेनचे प्रोजेक्ट आणले जातात. जपानमध्ये आज आर्थिक मंदी आहे. सर्वात फास्ट ट्रेन ही जपानमध्ये आहे. फास्ट ट्रेनची कारखानदारी जपानमध्ये आहे, पण त्याला मार्केट नाही. जपान आर्थिक मंदी कमी करण्यासाठी आपल्याकडे बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट सुरु आहे, असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

संबंधित बातम्या

सरकारशी लागेबांधे असणाऱ्यांनी आधीच नोटा बदलल्या : पवार

त्या व्यक्तीमुळे मी दिल्लीला जाणंच टाळलं: शरद पवार