मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, आता एक प्रसिद्ध पत्रका जारी करुन परमबीर सिंह यांनी हे आरोप सिद्ध करावे अन्यथा अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचा इशारा देशमुख यांनी दिलाय.


गृहमंत्री प्रसिद्ध पत्रकात काय म्हणाले?


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. पुढील महत्त्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरून परमबीर सिंह हे कसे खोटे बोलत आहेत, ही बाब आपल्या लक्षात येईल. 


सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंह एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही? 


आपणास उद्या म्हणजे दिनांक 17 मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी दिनांक 16 मार्चला एसीपी पाटील यांना व्हॉटसअप चॅटवरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंह यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या चॅटच्या माध्यमातून परमबीर सिंह यांना पध्दतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या चॅटवरून उत्तरे मिळविताना परमबीर सिंह किती अधीर झाले होते हे त्यांच्या चॅटवरून आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंह हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय? 


18 मार्च रोजी मी लोकमतच्या कार्यक्रमामध्ये परमबीर सिंह यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंह यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.


पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंह यांच्या अत्यंत जवळचे आहेत. 16 वर्षे निलंबित असलेल्या वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंह यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला.


परमबीर सिंह यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे. 


स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंह यांनी हे खोटे आरोप केले आहेत.


सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारीमध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंह म्हणतात तर त्याचवेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते? 


विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे.


स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरण यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी परमबीर सिंह यांनी रचलेले हे षडयंत्र आहे 


मुख्यमंत्री यांनी परमबीर सिंह यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही अनिल देशमुख यांनी केली आहे.