Mumbai Watermelon Family death News: मुंबईच्या पायधुनी परिसरातील एका कुटुंबातील चार जणांचा सोमवारी अचानक मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूसाठी कलिंगडामुळे झालेली विषबाधा कारणीभूत मानली जात आहे. पायधुनीच्या घाटी मोहल्ल्यातील मोगल उमरेट्टी इमारतीमध्ये ही घटना घडली. अब्दुल्ला डोकाडिया (40), नसरीन डोकाडिया (35) आणि त्यांच्या मुली आयशा (16) व झैनब (13) अशी मृतांची नावे आहेत. या चौघांनी रविवारी बिर्याणी (Biryani) खाल्ली होती, त्यानंतर रात्री दीड वाजता या सगळ्यांनी कलिंगड (Watermelon) खाल्ले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्यांना उलट्या व जुलाब सुरु होऊन त्यांची प्रकृती बिघड गेली आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पायधुनीसह संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली होती. या घटनेनंतर मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात कलिंगड खाण्याविषयी भीती बसली आहे. (Mumbai Crime news)
या घटनेनंतर पोलिसांनी डोकाडिया कुटुंबाने खाल्लेले कलिंगड नक्की कुठून आणले होते, याचा तपास सुरु केला होता. या कलिंगडावर रसायनांचा मारा केला होता का, तसे असेल तर संबंधित विक्रेत्याने तशी आणखी किती कलिंगडं विकली होती, याचा शोध पोलीस घेत आहेत. अब्दुल्लाने रविवारी नळबाजार येथील फ्रूट मार्केटमध्ये जाऊन हे कलिंगड खरेदी केले होते. त्याने मृत्यूपूर्वी तसा जबाब दिला होता. त्यामुळे पोलिसांनी अब्दुल्लाने नळ बाजारातील नक्की कोणत्या कलिंगड विक्रेत्याकडून खरेदी केली होती, याचा शोध सुरु केला होता. पोलिसांनी नळ बाजारातील तीन ते चार कलिंगड विक्रेत्यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावले होते. त्यांच्यापैकी नक्की कोणाकडून अब्दुल्लाने कलिंगड विकत घेतले, याबद्दल चौकशी करण्यात आली. तसेच या परिसरात आणखी कोणाला कलिंगड खाल्ल्यामुळे त्रास झाला आहे का, याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
डोकाडिया कुटुंब हे पायधुनीतील घाटी मोहल्ल्यातील मुघल इमारतीमध्ये राहत होते. अब्दुल्ला अंधेरीमध्ये मोबाईल फोन ॲक्सेसरीजचे दुकान चालवत होते. त्यांच्या दोन्ही मुली आपल्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत होत्या. आयेशा दहावीची परीक्षा अत्यंत उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होईल अशी कुटुंबाला अपेक्षा होती, तर झैनब नववीच्या वर्गात जाणार होती, असे पोलिसांनी सांगितले. त्यांचे इतर चार भाऊ मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. शनिवारी त्यांनी सर्व भावांना घरी जेवायला बोलावले होते. चौघांपैकी दोन भाऊ आणि त्यांची तीन मुले असे पाच जण जेवायला आले. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास सर्वांनी बिर्याणी, तसेच इतर अन्नपदार्थ एकत्र खाल्ले. भाऊ आणि त्यांची मुले रात्री घरी परतल्यानंतर अब्दुल्ला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घरामध्ये शिल्लक असलेले अर्धे कलिंगड खाल्ले आणि झोपी गेले, अशी माहिती आतापर्यंतच्या तपासातून समोर आली आहे.
आणखी वाचा
बिर्याणी आणि कलिंगड खाऊन संपूर्ण कुटुंब संपलं; मृतांच्या शरीरात आढळला हादरवणारा पदार्थ
