मुंबईतील गाडीवानांनो सावधान...! सहा वर्षात 228 कोटींच्या गाड्या चोरीला, केवळ 75 कोटींच्या गाड्या परत मिळाल्या
एबीपी माझा वेब टीम | 09 May 2019 03:01 PM (IST)
मुंबईमध्ये एकूण 70 लाख वाहने आहेत. यामुळे वाहनचोरांची सुद्धा चांदी झाली आहे. कारण गेल्या 6 वर्षात 227 कोटी 78 लाख 24 हजार 859 रुपये किमतीच्या गाड्या चोरीला गेल्या आहेत.
मुंबई : मुंबईत जर तुमच्याकडे गाडी असेल तर तुमची गाडी सुरक्षित नाही, असे मानून चला. कारण मुंबईमध्ये गेल्या 6 वर्षात 227 कोटी 78 लाख 24 हजार 859 रुपये किमतीच्या गाड्या चोरीला गेल्या आहेत. यापैकी पोलिसांनी फक्त 74 कोटी 60 लाख 9 हजार 321 रूपये किमतीच्या गाड्या हस्तगत करण्यात यश आलं आहे. ही माहिती मिळाली आहे माहिती अधिकार कार्यकर्ते शकील शेख यांनी यांनी मागवलेल्या माहितीमधून. मुंबईमध्ये एकूण 70 लाख वाहने आहेत. यामुळे वाहनचोरांची सुद्धा चांदी झाली आहे. कारण गेल्या 6 वर्षात 227 कोटी 78 लाख 24 हजार 859 रुपये किमतीच्या गाड्या चोरीला गेल्या आहेत, अशी माहिती RTI कार्यकर्ते शकील शेख यांना मुंबई पोलीस विभागाने दिली आहे. या वाहनांमध्ये दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. शकील शेख यांनी 2013 पासून ते 2018 पर्यंत मुंबईमध्ये किती वाहने चोरी झाली आणि त्यातील किती वाहने हस्तगत करण्यात आली, अशी माहिती मागितली होती. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक वर्षातील आकडे हे धक्कादायक आहेत. 2013 पासून प्रत्येक वर्षाला चोरी झालेल्या वाहनांची नोंद 2013 मध्ये एकूण 3789 वाहने चोरीला गेली. या घटनांमध्ये 62,13,43,556 रुपये इतक्या किमतीची वाहने चोरी झाली. यापैकी फक्त 859 गुन्हे उघड झाले आहे असून 14,47,14,612 रुपये इतक्या किमतीची वाहने परत मिळाली आहेत. 2014 मध्ये एकूण 3474 वाहने चोरी झाली. 52,26,07,084 रुपये इतक्या किमतीची वाहने या वर्षी चोरीला गेली असून फक्त 906 गुन्हे उघड झाले आहेत. तसेच 14,44,98,452 रुपये इतक्या किमतीची वाहने परत मिळाली आहेत. 2015 मध्ये एकूण 3311 वाहने चोरी झाली. 40,45,71,864 रुपये इतक्या किमतीची वाहने या वर्षी चोरीला गेली असून फक्त 840 गुन्हे उघड झाले आहेत. तसेच 11,07,67,314 रुपये इतक्या किमतीची वाहने परत मिळाली आहेत. 2016 मध्ये एकूण 3118 वाहने चोरी झाली. 38,40,75,485 रुपये इतक्या किमतीची वाहने या वर्षी चोरीला गेली असून फक्त 861 गुन्हे उघड झाले आहेत. तसेच 11,01,23, 316 रुपये इतक्या किमतीची वाहने परत मिळाली आहेत. 2017 मध्ये एकूण 3012 वाहने चोरी झाली. 29,86,13,601 रुपये इतक्या किमतीची वाहने या वर्षी चोरीला गेली असून फक्त 935 गुन्हे उघड झाले आहेत. तसेच 10, 49, 49, 427 रुपये इतक्या किमतीची वाहने परत मिळाली आहेत. 2018 मध्ये एकूण 3203 वाहने चोरी झाली. 31, 53, 65, 569 रुपये इतक्या किमतीची वाहने या वर्षी चोरीला गेली असून फक्त 1331 गुन्हे उघड झाले आहेत. तसेच 13,09,56,200 रुपये इतक्या किमतीची वाहने परत मिळाली आहेत. सदर वाहनांच्या चोरीमध्ये आंतरराज्य वाहन चोरांचा समूह सहभागी असून मोठ्या प्रमाणात चोरी झालेली वाहने नेपाळमध्ये विकली जातात तसेच भंगारमध्ये सुद्धा विकली जातात यावर ठोस कारवाई करण्याची गरज आहे. 24 तास मॅन्युअली सीसीटीव्ही वर नजर ठेवण्यासाठी कर्मचारी/अधिकारी नियुक्त करावे, अशी मागणी शकील अहमद शेख यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे.