मुंबई : आठवड्याचा पहिलाच दिवस लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी धडकी भरवणारा ठरला. सोमवारच्या सकाळी मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकाजवळ एक भीषण दुर्घटना घडली. दोन लोकलमधले दरवाजाजवळचे प्रवासी एकमेकांना घासले गेले आणि आणि त्यातले 13 प्रवासी चालत्या ट्रेनमधून खाली पडले. यात चौघांचा मृत्यू झाला. मुंबईची लोकल ही प्रवाशांसाठी लाईफलाईन मानली जाते. पण याच लोकलचा ट्रॅक काही प्रवाशांसाठी डेथलाईन ठरला.

आपापल्या कार्यालयात वेळेत पोहोचण्याच्या इर्ष्येनं लाखो मुंबईकर नेहमीप्रमाणं मुंबई लोकलनं कामावर निघाले. नेहमीप्रमाणंच काहीजण लोकलच्या डब्यात शिरले तर अनेकजण नेहमीप्रमाणं लोकलच्या दारात लटकले. मात्र यापैकी काही प्रवासी ऑफिसला पोहोचू शकले नाहीत आणि काहीजण आता घरीदेखील परतू शकणार नाहीत.

Mumbai Railway Accident : मुंब्र्याचं वळण चौघांच्या जीवावर बेतलं

ही दुर्घटना घडली ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा रेल्वे स्टेशनच्या परिसरात. कल्याणकडून मुंबईच्या दिशेनं जाणारी लोकल आणि मुंबईकडून कल्याणच्या दिशेला जाणारी लोकल या दोन्हीतले प्रवासी एकमेकांना घासून हा अपघात झाला.

कसारा-सीएसएमटी ही लोकल नेहमीप्रमाणं गर्दीनं खचाखच भरली होती. मुंब्र्यात असणाऱ्या शार्प वळणावर ही ट्रेन असतानाच शेजारच्या ट्रॅकवरून दुसरी लोकल कल्याणच्या दिशेनं चालली होती. यावेळी मुंब्र्याच्या वळणापाशी ट्रेन एका बाजूला झुकल्यामुळं दारात लटकलेले प्रवासी आपला हात सुटु नये, यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होते. मात्र त्याचवेळी शेजारून जाणारी ट्रेन घासल्यामुळं दोन्ही ट्रेनमधले 13 प्रवासी खाली पडले. 

Mumbai Local Train Accident : दररोज लाखो प्रवाशांचा धोका पत्करून प्रवास

सकाळी सात वाजल्यापासून कसारा आणि खोपोली या दोन्ही मार्गांवरून कल्याणमार्गे मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढायला सुरुवात होते. साधारण 11 वाजेपर्यंत प्रत्येक लोकल ही प्रवाशांनी खचाखच भरलेली असते आणि डब्यांच्या दाराबाहेर अनेक प्रवासी जिवाचा आटापिटा करत प्रवास करत असतात.

एका हाताने आधार पकडत आणि दुसऱ्या हातानं आपली बॅग सांभाळत लाखो प्रवासी दररोज जिवाचा धोका पत्करुन आपलं ऑफिस गाठतात. गर्दीचा उच्चांक गाठला जातो, अशा सकाळी साडेनऊच्या सुमाराला दोन्ही बाजूच्या लोकल ट्रेन एकमेकांच्या जवळून पास झाल्यामुळं ही दुर्घटना घडल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. लोकलमधून खाली पडलेल्या 13 प्रवाशांपैकी चौघांचा यात दुर्दैवी मृत्यू झालाय. 

Mumbai Railway Accident : लोकल अपघातात चौघांचा बळी 

1. केतन दिलीप सरोज(पु/23 वर्ष, राहणार: तानाजी नगर, उल्हासनगर)2. राहुल संतोष गुप्ता3. विकी बाबासाहेब मुख्यदल(पु/34 वर्ष, रेल्वे पोलीस कर्मचारी)4. मयुर शाह (44) 

अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या मुंब्रा पोलिसांनीदेखील लोकलमधील प्रचंड गर्दीमुळेच अपघात झाल्याचं म्हटलं. लोकल अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांसमोर दुःखाचा डोंगर तर उभा आहेच. शिवाय घरातील कमावती व्यक्ती अचानक या जगातून निघून गेल्यामुळं उभी राहणारी आर्थिक आव्हानंही आहेत. 

तितकीच दुर्दैवी गोष्ट म्हणजे... उद्यादेखील लोकलला अशीच गर्दी होणार आहे.  लोकांना असंच दारात लटकत प्रवास करावा लागणार आहे आणि आपणही असेच मरु शकतो, या भीतीसह या ‘लाईफलाईनचा’ प्रवास सुरु ठेवावा लागणार आहे. 

ही बातमी वाचा: