Mumbai Rains Aqua Line Metro: मुंबईतील भुयारी मेट्रो स्थानकात पाणी घुसलं, Aqua line वर मेट्रोचं दार उघडताच तळ्यात उतरल्याचा भास
Mumbai Rains Aqua Line Metro: मान्सूनने मुंबईत दाखल होण्याचा रेकॉर्ड देखील मोडला आहे. मुंबईतील महत्त्वकांशी प्रकल्प एक्वा लाइन-3 ला पावसाचा फटका बसला आहे.

Mumbai Rains Aqua Line Metro मुंबई: राज्यासह आता मुंबईत देखील मान्सून (Mumbai Rains Updates) दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तसेच मान्सूनने मुंबईत दाखल होण्याचा रेकॉर्ड देखील मोडला आहे. मुंबईतील पावसाचा मेट्रो-3 प्रकल्पाला (Mumbai Rains Aqua Line Metro) फटका बसला आहे.
मुंबईतील महत्त्वकांशी प्रकल्प एक्वा लाइन-3 ला पावसाचा फटका बसला आहे. मुंबईतील आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले आहे. मेट्रोमधून उतरताच प्रवाशांना तळ्यात उतरल्याचा भास होताना दिसला. दरम्यान, पाणी साचल्यानंतर मेट्रो सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भुयारी मेट्रोकडे जाणारे गेटही बंद करण्यात आला आहे. मुंबईतील अंडरग्राउंड मेट्रो-3 ही नुकतीच धावू लागली. मात्र मुंबईतील पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोला याचा फटका बसला.
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीला रेड अलर्ट-
मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागात 200 मिमीहून अधिक पावसाची शक्यता आहे. सातारा आणि घाट परिसर, पुण्यातील घाट परिसर इथे देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईतील कोणत्या भागात किती पाऊस?
⛈बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रविवार २५ मे २०२५ च्या मध्यरात्रीपासून व सोमवार २६ मे २०२५ सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वाधिक पाऊस पडलेल्या ठिकाणांची आकडेवारी पुढीलप्रमाणे
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 26, 2025
(नोंद मिलिमीटरमध्ये)
🔹नरिमन पॉईंट अग्निशमन केंद्र २५२
🔹ए विभाग कार्यालय २१६
🔹महानगरपालिका मुख्यालय २१४…
मेट्रो-3 कडून स्पष्टीकरण-
मुसळधार पावसाने आचार्य अत्रे चौक स्थानकानजीकची एक संरक्षक भींत कोसळल्याने भुयारी स्थानकात पाणी शिरल्याची घटना घडली आहे. मात्र एक बाब लक्षात घेतली पाहिजे, या स्थानकाचे अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जेथून हे पाणी शिरले तो मार्ग आगमन वा प्रस्थानासाठी वापरण्यात येत नव्हता. तेथे कायमस्वरुपी काम अद्याप पूर्ण झालेले नाही. (हे कायमस्वरुपी काम येत्या 3 महिन्यात होईल). मात्र तुर्तास तेथून पाणी येऊ नये म्हणून तात्पुरती संरक्षक भींत उभारण्याचे काम सुरु होते. हे पूर्ण काम 10 जूनपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज होता. मात्र, पाऊस लवकर आला. लगतच्या भागातून पाण्याचा मारा आणि मुसळधार पावसाने यामुळे ती पडली. खबरदारीचा उपाय म्हणून वरळी ते आचार्य अत्रे चौक येथील मेट्रो वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली आहे. आरे जेव्हीएलआर ते वरळीपर्यंतची भुयारी मेट्रो वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे. मेट्रो-3 चे अभियंते आणि सुरक्षा चमू यावर युद्धपातळीवर काम करीत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
पावसामुळे पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वेसेवा विस्कळीत-
मुंबई आणि उपनगरातील पावसाचा लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम झाला आहे. ठाणे ते सीएसएमटीकडे जाणारी जलद वाहतूक 40 मिनिटं उशिराने सुरु आहे. ठाणे ते कल्याण जलद आणि धिमी वाहतूक 15 मिनिटं उशिराने सुरु आहे. ठाणे रेल्वे स्थानकात काही इंडिकेटर बंद झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. तर काही काळ ठप्प झालेली हार्बर मार्गावरील सेवा पूर्ववत झाली आहे. मात्र वाहतूक उशिराने सुरु आहे. याशिवाय सीएसएमटी स्थानकात एक्सप्रेस ट्रेनच्या ट्रॅकवर पाणी आल्याने काही गाड्यांची वेळ बदलण्यात आलीय. सीएसएमटी-हिंगोली जनशताब्दी गाडी दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी रवाना होणार आहे. तर सीएसएमटी-धुळे एक्सप्रेसही 1 वाजून 40 मिनिटांनी रवाना होणार आहे. तसेच पश्चिम द्रुतगती मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

























