Mumbai Pune Expressway traffic jam: काही दिवसांपूर्वी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे तब्बल 32 तास प्रवाशांचा खोळंबा झाला होता. या घटनेची चांगलीच चर्चा रंगली होती. यावरुन सरकार आणि प्रशासनावरही अनेकांनी यथेच्छ टीका केली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन वायूचा टँकर (Propylene Gas Tanker) उलटल्यामुळे अपघात झाला होता. या टँकरमधून वायूगळती सुरु झाल्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील (Mumbai Pune Expressway) वाहतूक थांबवण्यात आली होती. पुढील अनेक तास या टँकरमधील वायू दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यात आला. हे काम अनेक तास सुरु असल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती. यावरुन बरीच टीका होत असली तरी ही दुर्घटना आणखी किती भीषण असू शकली असती आणि पेरुच्या झाडाच्या लाकडापासून (guava tree wood) बनवलेल्या एका खुट्टीमुळे पुढचा अनर्थ कसा टळला, याची माहिती आता समोर आली आहे. 

Continues below advertisement

मुंबई-पुणे महामार्गावर टँकर अपघातानंतर प्रोपोलिन वायूगळती होत असताना एका “पेरू”च्या झाडापासून बनवलेल्या खुट्टीने हजारो प्रवाशांचा जीव वाचवला. उच्च दाबाखाली द्रवरूपात वाहणारा प्रोपिलीन दाब कमी होताच वेगाने बाहेर पडतो आणि तापमान –20 ते –23 अंशांपर्यंत घसरते. त्यामुळे वायू गळतीच्या ठिकाणी बर्फ साचतो. हा बर्फ हाताला लागला तर जणू आग लागल्यासारखी जखम होते. अपघातानंतर टँकर चालकाने हाताने ही वायू गळती रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याचे दोन्ही हात भाजून निघाले, मदतकार्यातील एक चुकीचा निर्णय अनेकांच्या जीवावर बेतला असता

जर टँकरमधील प्रोपोलिन वायू ज्वलनशील गोष्टींच्या संपर्कात आला असता, मोठा स्फोट झाला असता. या स्फोटांमुळे आसपास परिसरातील 10 किलोमीटरपर्यंत नुकसान झाले असते. दुर्दैवाने जर का तसे झाले असते, तर तो घाट परिसर राहिलाच नसता. कारण त्या टँकरमध्ये 22 टन प्रोपोलिन वायू नेहाला जात होता. हा वायू इतका घातक होता की, त्याचा वास येत नाही, मात्र कालांतराने तो शरीरात भिनला की श्वास रोखतो आणि ज्वलनशील गोष्टींच्या संपर्कात आल्यास पेट घेतो.

Continues below advertisement

Mumbai Pune Expressway Accident: टँकरमधील वायूगळती रोखण्यासाठी पेरुच्या झाडापासून बनवलेली खुट्टी का वापरली?

महामार्गावरील वाहने ही अपघातक्षेत्रापासून दोन्ही बाजूने 1 किलोमीटर परिसरआधीच थांबवली होती. लोकांना वाहतूक कोंडींचा त्रास झाला मात्र, मदतकार्यादरम्यान एक चुकीचे पाऊल हजारोंचा बळी गेला असता. अपघातात टॅकरचा मेन व्हॉल्व तुटल्याने ही वायू गळती वेगाने होऊ लागली.  ही वायू गळती रोखण्यासाठी तज्ञांनी पेरूच्या झाडाची खुट्टी बनवून ती गळती नियंत्रणात आणली. ३६ तास हे ऑपरेशन सुरु होते. ही वायू गळती रोखण्यासाठी पेरूच्या झाडाचीच खुट्टी का बनवण्यात आली कारण, पेरूचे लाकूड मऊ व लवचिक असल्याने थंडीत फुगते आणि घट्ट घुसल्याने ती फुगते, अगदी वाईनच्या बाटलीवर ज्या पद्धतीने लाकडाचे सील लावतात त्याप्रमाणेच पेरुच्या झाडाच्या लाकडापासून बनवलेल्या खुट्टीने काम केले.

विशेष म्हणजे हा अपघात ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणाहून काही अंतरावरून पेट्रोल कंपन्यांच्याही लाईन गेल्या होत्या. वाहतूक कोंडी सुरळीत ठेवण्यासाठी टँकर हलवण्यासाठी टॅकरमधील वायूचे वजन कमी करणे आवश्यक होते. तीन टप्प्यांत गॅस ट्रान्सफर करण्यात आला आणि मोठी दुर्घटना रोखण्यात यश आले. या अपघातामुळे  “32 तासांची वाहतूक कोंडी”ची चर्चा रंगली खरी, मात्र, या 32 तासात मदतकार्यातील प्रत्येक जण जीव धोक्यात घालून काम करत होता.

आणखी वाचा

एका टँकरने मुंबई-पुण्याचा संपर्कच तोडून टाकला, 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर नेमकं काय घडलं?