भिवंडी : व्हॉट्सअ‌ॅपवर व्हिडीओ स्टेटस ठेवून एका तरुणाने नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना भिवंडीमध्ये घडली आहे. मयूर रामा जाधव (वय 20 वर्षे) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. कल्याण-पडघा मार्गावरील गांधारी पुलाजवळ सोमवारी (10 मे) ही धक्कादायक घटना घडली. नदीपात्रात शोध सुरु आहे. 


मयूर हा कल्याण पश्चिम परिसरातील बारावे या गावात कुटुंबासह राहत होता. काल सकाळपासूनच तो दारुच्या नशेत होता, असं सांगितलं जात आहे. धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी मयूरने आपल्या मोबाईलवर एक व्हिडीओ बनवला होता. दारु ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट असल्याचं तो या व्हिडीओमध्ये बोलत आहे. 


या व्हिडीओमध्ये त्याने पुढे म्हटलं आहे की, "काही गोष्टी अशा घडल्या की आता समोर कोणताच मार्ग दिसत नाही. माझी आठवण जेव्हा काढाल तेव्हा हसून काढा. तुमच्या जीवनातील असा जोकर होता तो, आतून तुटलेला, मात्र तुम्हाला हसवत राहिला, असं म्हणत त्याने गांधारी पुलावरुन नदीपात्रात उडी घेतली.


व्हॉट्सअॅपमधील व्हिडीओ स्टेटसमुळे ही घटना समोर आली. यानंतर  खडकपाडा आणि पडघा या दोन्ही पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी  घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाच्या मदतीने मयूरचा शोध सुरु केला आहे. 


मात्र, मयूरने आत्महत्या का केली याचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पडघा पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.