मुंबई : राज्य सरकारने बुलेट ट्रेनचा खोडा दूर केल्यानंतर केंद्र सरकारकडून कोस्टल रोडला पर्यावरण विभागाचा हिरवा कंदील दाखवण्यात आला. या निर्णयामुळे मुंबईतील सागरी प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला आहे. यानंतर आता मुंबईसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मेट्रो कारशेड मार्गही मोकळा होण्याची शक्यता आहे. कांजूर कारशेडसाठी केंद्र आणि राज्य स्थरावर हालचलींना वेग आला आहे. लवकरात लवकर या संदर्भात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


कोस्टल रोड मार्गी लागणार
मुंबई आणि मुंबई उपनगर क्षेत्रासाठी असलेल्या कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लान (CZMP) आराखड्याला केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने अंतिम मंजुरी प्रदान केली आहे. याचा फायदा मुंबईतील प्रलंबित सागरी प्रकल्पांना होणार आहे. आता बांधकामाची मर्यादा 500 मीटरवरून थेट 50 मीटरपर्यंत कमी झाली आहे. याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचे आभार मानले आहेत. यात महत्वाचा प्रकल्प कोस्टल रोडही आता मोकळा झाला आहे.


मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मुंबईतील सागरी प्रकल्पांचा मार्ग मोकळा! सागरी हद्द व्यवस्थापन आराखड्याला अखेर मंजुरी


मुंबईतील सागरी प्रकल्पांचा मार्ग मोकळा 
मुंबईतील सागरी प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला असून मुंबईच्या सागरी हद्द व्यवस्थापन आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. बांधकाम मर्यादा 500 मीटरवरून 50 मीटरवर आणण्यात आली आहे. सोबतच सीआरझेड 2019 ची अधिसूचना मंजूर करण्यात आल्याने याचा फायदा प्रलंबित प्रकल्पांना होणार आहे. सागरी हद्द व्यवस्थापन आराखडा मंजूर होत नसल्यामुळे सीआरझेड 2019 अजूनपर्यंत लागू होऊ शकत नव्हते. मात्र, आता त्याला मंजुरी मिळाल्यामुळे बांधकामाची मर्यादा 500 मीटरवरून थेट 50 मीटरपर्यंत कमी झाली आहे.



मुंबईत अशा प्रकारे सीआरझेड लागू केल्यामुळे अनेक प्रकल्पांचं बांधकाम रखडलं होतं. कोस्टल रोडसाठी देखील समुद्रात काही प्रमाणात बांधकाम करावं लागणार आहे. न्हावा-शेवा मार्गासाठी देखील पाणथळ जागेत पिलर टाकावे लागणार आहेत. त्यासाठी देखील बांधकाम आवश्यक आहे. अशा प्रकल्पांसाठी परवानगी घेणं आवश्यक ठरतं. या पार्श्वभूमीवर बांधकामासाठी समुद्रकिनाऱ्यापासून 500 मीटरऐवजी 50 मीटरपर्यंत मर्यादा आल्यामुळे अनेक प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला आहे.


कांजूरमार्ग मेट्रो कारशेडलाही परवानगी मिळणार?
याच महिन्याच्या 14 तारखेला नीती (NITI) आयोगाच्या शीर्ष पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेतली, त्या बैठकीत मुंबईतील कांजूरमार्ग येथे मेट्रो -3 साठी प्रस्तावित कार शेड बांधण्यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. आणि लवकरात लवकर सकारात्मक विचार कारशेड विषय केला जाईल असा विश्वास नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजीव कुमार, कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता. ही बैठक दक्षिण मुंबईतील 'सह्याद्री' अतिथीगृहात झाली होती.