Mumbai Metro: मुंबईतील सर्वात गजबजलेल्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो 1 मार्गिकेवरील प्रवाशांची गर्दीतून सुटका करण्यासाठी 'मुंबई मेट्रो वन'ने (MMOPL) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, आता अंधेरी ते घाटकोपर या सर्वाधिक गर्दीच्या टप्प्यासाठी कमी अंतराच्या म्हणजेच 'मिक्स्ड लूप' (Mixed Loop) मेट्रो फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. गेल्या शनिवारी एमएमओपीएलने याची यशस्वी चाचणी (Successful Trial) घेतली असून, मेट्रो मार्गिकेवर प्रवाशांची गर्दी वाढताच हा पर्याय तात्काळ लागू केला जाणार आहे. या नवीन सुविधेमुळे गर्दीच्या वेळेत दर तासाला अतिरिक्त 20 हजार प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढणार आहे.

Continues below advertisement

Mumbai Metro: 88 टक्के प्रवासी केवळ अंधेरी-घाटकोपरदरम्यान

मेट्रो 1 मार्गिकेची एकूण लांबी 11.4 किलोमीटर असून, त्यावर एकूण 12 स्थानके (Stations) आहेत. सध्या या मार्गावर 4 डब्यांच्या गाड्या चालविल्या जात आहेत. मेट्रो प्रशासनावर असलेल्या कर्जाच्या बोज्यामुळे नवीन गाड्या खरेदी करणे किंवा 6 डब्यांची ट्रेन चालवणे सध्या मर्यादांचे ठरत आहे. सध्या कार्यालयीन दिवशी या मार्गावर रोज 5 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि पूर्व उपनगरांतून रेल्वे किंवा बसने येणारे बहुतांश प्रवासी घाटकोपर स्थानकातून मेट्रो पकडतात. धक्कादायक बाब म्हणजे, मेट्रो १ मधील एकूण प्रवाशांपैकी 88 टक्के प्रवासी हे केवळ घाटकोपर ते अंधेरीदरम्यानच प्रवास करतात. पावसाळ्यात ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने ही विशेष तयारी केली आहे.

Mumbai Metro: नेमका काय आहे हा 'मिक्स्ड लूप' बदल?

सध्या घाटकोपरहून निघालेली मेट्रो थेट शेवटच्या वर्सोवा स्थानकापर्यंत जाते आणि तिथून परत येते. मात्र, नव्या मिक्स्ड लूप बदलानुसार, घाटकोपर स्थानकातून सुटलेली एक गाडी केवळ अंधेरीपर्यंतच जाईल आणि तिथूनच पुन्हा घाटकोपरसाठी मागे फिरेल. स्थानकावरून सुटणाऱ्या दोन गाड्यांपैकी एक गाडी केवळ अंधेरीपर्यंत धावेल, तर दुसरी गाडी नेहमीप्रमाणे वर्सोव्यापर्यंत जाईल. यामुळे सर्वाधिक गर्दी असलेल्या टप्प्याला जास्तीत जास्त गाड्या मिळतील. हा बदल लागू झाल्यावर गाड्यांची वारंवारिता 6 ते 7 टक्क्यांनी वाढेल. यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या 482 पर्यंत वाढवता येईल, म्हणजेच दर तासाला 3 अतिरिक्त फेऱ्या उपलब्ध होतील.

Continues below advertisement

Mumbai Metro: गाड्यांच्या वेळेत काय बदल होणार?

मेट्रो 1 मार्गिकेवर सध्या गर्दीच्या वेळेत गाड्या दर 3 मिनिटे 20 सेकंदांनी धावतात, तर गर्दी नसलेल्या वेळेत त्या 5 मिनिटे 55 सेकंदांनी धावतात. ‘मिक्स्ड लूप’ वेळापत्रक लागू केल्यानंतर घाटकोपर ते अंधेरी दरम्यान गाड्या 3 मिनिटे 8 सेकंदांनी धावतील, तर वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान सेवा 5 मिनिटे 16 सेकंदांच्या अंतराने उपलब्ध होईल. प्रवाशांची मागणी वाढल्यास हे सुधारित वेळापत्रक लागू केले जाईल. गर्दीच्या भागात उपलब्ध क्षमतेचा अधिक कार्यक्षम वापर करून प्रवाशांना अधिक चांगली आणि जलद सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Mumbai Rain Andheri Subway Photo: मुंबईत मुसळधार पाऊस, अंधेरी सबवे पूर्णपणे पाण्याखाली, रिक्षा बुडाली, चालकाला बाहेर खेचले, PHOTO