मुंबई : राजधानी मुंबईत (Mumbai) सुरू असलेल्या मराठा आंदोलनादरम्यान आणकी एका मराठा बांधवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील शिवनेरीजवळ एका मराठा बांधवाचा असाच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर, सर्वच आंदोलकांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र, आता आणखी एका आंदोलक युवकाचा मृत्यू झाल्यानंतर उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या विजय घोगरे (रा.टाकळगाव, ता.अहमदपूर,जि.लातूर) या तरुण कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यांना तत्काळ उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो मराठा बांधव मुंबईत येत आहेत. गाड्या घेऊन, कुणी रेल्वेने तर कुणी मिळेल ते वाहन पकडून मुंबई गाठत आहे. मात्र, गैरसोयी अभावी मराठा बांधवांचे हाल होताना दिसून येते. गेल्या दोन दिवसांपूर्वीच जुन्नर येथे आंदोलनात सहभागी असलेल्या एका कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर, आज मुंबईत अशीच घटना घडल्याने मराठा समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईत आमरण उपोषण करत आहेत. तर कार्यकर्त्यांचा वाढता उत्साह आणि सलग घडणाऱ्या दुर्दैवी घटनांमुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मुंबईती सीएसएमटी परिसरात आज विजय घोगरे या युवकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप करत इशारा दिला आहे.
सरकारने आमचे दोन बळी घेतले - पाटील
राजधानी मुंबईत सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून मराठा आंदोलक शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या मागत आहेत. मात्र, राहण्या-खाण्याची गैरसोय होऊनही आंदोलक शिस्तीने लढा देत आहेत. दरम्यान, शिवनेरी येथे एका मराठा आंदोलकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता, त्यानंतर आज मुंबईतील सीएसटी परिसरात आणखी एका मराठा बांधवाला हर्ट अटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्दैवी घटनेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. सरकारने आमचे दोन बळी घेतल्याचं सांगत, तुम्हाला पुढच्या शनिवारी-रविवारी दिसेल, मुंबईत मराठे येतात किती ते, असे म्हणत जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.