मुंबई : मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बचावलेल्या एका 21 वर्षीय प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तरुणीनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केंद्र तसेच राज्य सरकारने राहण्यासाठी घर देण्याचे आश्वासन देऊनही अद्याप त्याची पूर्तता न केल्यानं देविका रोटावन यांनी ही याचिका दाखल केली आहे. आपल्या कुटुंबियांना राहण्यासाठी घर व आपलं पदवी शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासनाने तरतूद करावी, अशी मागणी तिने याचिकेतून केली आहे.


26/11 रोजी अचानक लष्कर ए तोयबाच्या दहशतवादी अजमल आमिर कसाब आणि इतर दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यावेळी देविका आपल्या कुटुंबियांसह पुण्याला जाण्यासाठी स्टेशन परिसरात आली होती. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात देविकाच्या उजव्या मांडीला गोळी लागली होती. अतिरेक्यांनी तिच्या दिशेने ग्रेनेड हल्लाही केला त्यावेळी तिचे पालकही त्याठिकाणी उपस्थित होते. गोळी लागल्यामुळे देविका बेशुद्ध झाली होती. दहशतवादी स्टेशन परिसरातून निघून जाताच पोलिसांनी तिला जवळच्याच सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिच्यावर सहा शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.


त्यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारतर्फे वांद्रे सुभाषनगर येथील चाळीतील भाड्याच्या खोलीत भेट देऊन तिची विचारपूसही केली होती. देशावर झालेल्या या दहशतवादी हल्यातील एक प्रमुख साक्षीदार म्हणून ईडब्लूएस स्कीम अंतर्गत तिला घर देण्याचे आश्वासन दिले गेले होते. मात्र त्याची अद्याप पूर्तता न केल्याने देविका हिने अॅड. उत्सव बैंस यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आपल्या वडील व भावाला गरिबीमुळे सध्या भाड्याचं घर चालवणं कठीण जात असून शासनाने राहण्यास घर द्यावे तसेच आपल्या शिक्षणाचाही खर्च उचलावा अशी विनंती तिने या याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. याआधीही एका समाजसेवी संस्थेनं 26/11 च्या हल्यातील बळींच्या कुटुंबियांना योग्य ती नुकसान भरपाई न मिळाल्याबद्दल हायकोर्टाच याचिका दाखल केली होती.