मुंबई : मराठा समाजाकडून विचारणा झाली, तर समन्वयासाठी मी स्वत: नक्कीच पुढाकार घेईन, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. मराठा आंदोलन आणि मुंबई बंदच्या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एबीपी माझाला खास मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, मूक मोर्चे, आंदोलन, बंद इत्यादी गोष्टींवर आपली भूमिका मांडली.


खासदार संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?

मराठा आंदोलनाशी संवाद घडत नाही. सध्या मध्यस्थाची मुख्य गरज आहे. त्यात एक नाव तुमचंही आहे. तुम्ही पुढाकार घेणार का? असा प्रश्न एबीपी माझाने खासदार संभाजीराजे छत्रपती यांना विचारले असता, ते म्हणाले, “धन्यवाद, तुम्हाल असं वाटतं की, मी पुढाकार घेऊ शकेन. पण मराठा समाजाचा लढा हा समाजातील घटकांचा आहे. इथे कुणीही नेता नाही किंवा दुसरं कुणी नाही. त्यांचं क्रेडिट आपण घेऊ शकत नाही. मात्र समाजाकडून विचारणा झाल्यास आपण नक्की हा विषय पुढे घेऊन जाऊ.”

मराठा आरक्षणाचा विषय अडचणीचा आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्याशिवाय तोडगा निघणार नाही, असे संभाजीराजे म्हणाले.

संभाजीराजेंकडून शांततेचं आवाहन

मराठा समाजाचे शांततेत मोर्चे निघाले. त्यामुळे आता आपण कायदा हातात घेतला, तर ते चुकीचं ठरेल. आपल्या मागण्यांसाठी अनेक मार्ग आहेत, ज्याद्वारे दबाव निर्माण करु शकतो, असे म्हणत खासदार संभाजीराजे यांनी शांततेचं आवाहनही केले.

पाहा खासदार संभाजीराजे यांची मुलाखत :