मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी जेनझी आणि जनरेशन अल्फाशी संवाद साधला. I.I.M.U.N. च्या 15 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात युवा परिषदेला देशभरातील १०० हून अधिक शहरांमधून विद्यार्थी सहभागी झाले होते. या परिषदेत मोहन भागवत यांना खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? असे प्रश्न विचारण्यात आले. यावर मोहन भागवत यांनी निवेदकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणासंदर्भात काय विचार होते ते पाहावेत, असं सांगितलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आरक्षणाबाबतचे विचार पाहा
मी तुमच्या प्रश्नाचं थेट उत्तर देणार नाही, मी तुला सांगेन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणासंदर्भात काय विचार होते ते पाहावे. प्रामाणिकपणे आम्ही त्यांचा सल्ला फॉलो करत असू तर त्याची काही अडचण नाही. सामाजिक कारणांमुळं आरक्षण आहे. सामाजिक शोषण आहे तोपर्यंत आरक्षण सुरु राहील, असं मोहन भागवत यांनी म्हटलं.
मोहन भागवत पुढे म्हणाले की आरक्षण ज्यांना मिळालं, ज्यांची परिस्थिती सुधारली त्यांनी मोठ्या मनानं ते द्यावं. हे योग्यप्रकारे व्हावं, आरक्षण मिळतं त्यातील काही जण, जे थोड्या संख्येनं आहेत ते म्हणतात आता आम्ही घेतलं, आमचं व्यवस्थित झालं, आता दुसऱ्यांना द्या. उपवर्गीकरणाची मागणी काही प्रांतामध्ये झाली. सुप्रीम कोर्टानं देखील म्हटलं, ते का झालं आरक्षण सर्वांना मिळालं पाहिजे, असं भागवत म्हणाले.
आरक्षण मिळतं त्यांच्यामध्ये एक प्रवाह आहे, ते आमच्या प्रगतीसाठी असून ती कायमस्वरुपी उपाय नाही. आम्ही त्याचा फायदा घेतला, स्वत: प्रगत झालो, आरक्षण आतापर्यंत ज्यांना मिळालं नाही त्यांच्यासाठी असावं, असा प्रवाह आहे त्याला प्रोत्साहन द्यावं लागेल. यात राजकारण सोडावं लागेल, सर्व उपायांना प्रामाणिकपणे लागू केल्यास लवकर त्याची आवश्यकता संपेल तेव्हा विचार करु, असं मोहन भागवत म्हणाले.
मात्र, याचं राजकारण होईल, यामुळं कटुता निर्माण होईल. वास्तवात आरक्षण सामाजिक एकतेसाठी आणलं होतं. ती व्यवस्था चुकीची नाही, असंही भागवत यांनी स्पष्ट केलं.
