मुंबई : राज्यातील 5 कोटी जनता दुष्काळाने घेरलेली आहे. या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जाव्या यासह अन्य मागण्यांसाठी 27 नोव्हेंबरला मनसे औरंगाबादमध्ये दंडुका मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित नसतील मात्र मोर्चाला शेतकरी दंडुका घेऊन येतील आणि त्याचा कसा वापर करायचा ते त्यावेळी सांगू, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. मनसे नेते अनिल शिदोरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, सरकारने या स्थितीवर उपाययोजना केल्या मात्र नेमक्या काय उपाययोजना कराव्या लागतात याची माहिती सरकारला आहे की नाही? दुष्काळ नियंत्रण विभाग सुरू करणं अपेक्षित आहे मात्र तो अजून केलेला नाही. दुष्काळी भागात रोजगाराच्या योजना नाहीत त्यामुळे अनेकजण स्थलांतर करत आहेत. सरकारने रोजगारासाठी सुरू केल्या पाहिजे, असे ते म्हणाले. जनतेसह विरोधी पक्ष आणि मनसेने आवाज उठवल्याने सरकारने दुष्काळ घोषित केला. मात्र हा दुष्काळ केवळ कागदावरच असल्याची टीका मनसेने केली आहे. महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे आणि सरकारची काहीही तयारी नाही, असा आरोप देखील शिदोरे यांनी केला. दुष्काळाच्या स्थितीत जनावरांसाठी काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. म्हणूनच सरकारला जाग यावी यासाठी 27 नोव्हेंबरला मनसे औरंगाबादमध्ये दंडुका मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला राज ठाकरे उपस्थित नसतील मात्र शेतकरी दंडुका घेऊन येतील आणि त्याचा कसा वापर करायचा ते त्यावेळी सांगू, असे शिदोरे म्हणाले.