अंबरनाथ : नोकरी देण्याच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करणाऱ्यांच्या टोळीचं पितळ पुन्हा एकदा उघडं पडलं आहे. रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार अंबरनाथ पोलिसांनी उघड केला आहे. याप्रकरणी आयआरसीटीसीच्या एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कैलास राजपाल सिंह अस या भामट्याच नाव आहे. 


बदलापूरला राहणारा कुमार चव्हाण हा नोकरीच्या शोधात असतानाच त्याला कैलास राजपाल सिंग या भामट्याने रेल्वेत नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवलं. कैलास आयआरसीटीसीच्या चर्चगेट स्टेशनवरील कँटीनमध्ये काम करत होता. 


खोटी परीक्षा, खोटी मुलाखत घेऊन पास होण्यासाठी 5 लाख रुपये त्याने कुमार चव्हाण याच्याकडून उकळले. आपली अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचं सांगून त्याने त्याला खोटं नियुक्तीपत्रही दिलं. मात्र हा सगळा प्रकार खोटा असून आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच कुमार याने पोलिसात धाव घेतली. 


देवेंद्र फडणवीस यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव


अंबरनाथ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. कैलाश  दर एक ते दोन महिन्यांनी राहण्याचा ठावठिकाणा बदलत होता. अखेरीस विरारहून त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. यानंतर या संपूर्ण प्रकरणात रेल्वेचे दोन अधिकारीसुद्धा सहभागी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. कैलास सिंह हा या अधिकाऱ्यांना नवी गिऱ्हाईकं शोधून द्यायचा, तर हे अधिकारी बनावट लेटरहेड आणि शिक्के वापरुन फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे. पोलीस आता या दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहेत. अशाच पद्धतीनं या त्रिकुटाने अनेकांना गंडा घातल्याची शक्यता असून त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.