Manoj Jarange Mumbai Visit : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) आजपासून दोन दिवसीय मुंबई (Mumbai News) दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे मुंबईत, विविध मराठा संघटना (Maratha Organization), मराठा समाजबांधवांच्या भेटीगाठी घेणार आहेत. मुंबईत दाखल झाल्या झाल्या मनोज जरांगे सिद्धीविनायक चरणी नतमस्तक झाले. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी मोठं आंदोलन केलं होतं. जरांगेंची समजूत काढण्यासाठी अख्खं सरकार जालना आंतरवालीत दाखल झालं होतं. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आश्वासनानंतर जरांगेंनी आपलं उपोषण मागे घेतलं. तेव्हापासूनच मनोज जरांगे राज्यभरात दौरा करत आहेत. 


मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेताना मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्यात यावं यासाठी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. उपोषण मागे घेतल्यापासूनच मनोज जरांगे मराठवाड्यासह राज्यभरात दौरा करत आहेत. तसेच, मुंबईनंतर मनोज जरांगे पुणे, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर आणि बीडचा दौरा करणार असून या भागांतील मराठा संघटना आणि मराठा समाजातील बांधवांच्या भेटीगाठी घेणार आहेत. तसेच, जरांगे पाटील  20 ऑक्टोबरला शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेणार आहेत. 


'त्या' जखमी समाज बांधवाला भेटण्यासाठी मनोज जरांगे रुग्णालयात


मराठा नेते मनोज जरांगे यांची 9 ऑक्टोबर रोजी येवला शहरात सभा पार पडली. यावेळी मनोज जरांगे यांच्या स्वागत मिरवणुकीत जेसीबीतून फुलांची उधळण करत असताना लोडर पलटी होऊन झालेल्या अपघातात चारजण जखमी झाले होते. त्यापैकी गोकुळ रावसाहेब कदम यांच्या डोक्याला मार लागल्यानं त्यांच्यावर शिर्डी जवळील कोपरगाव येथील एसजेएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रात्री जरांगे मुंबईकडे येत असताना त्यांनी गोकुळ कदम आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. मनोज जरांगे रुग्णालयाच्या बाहेर पडताच तरुणांनी त्यांच्यासोबत एक सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. माणुसकीच्या नात्यानं जर या समाज बांधवाला मदत करण्यात येत असेल तर ठीक आहे. मात्र, राजकारण म्हणून जर कोणी मदत करत असेल, तर मदत न केलेली बरी. समाज बांधव मदतीसाठी सक्षम असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. 


मनोज जरांगेंच्या प्रमुख मागण्या कोणत्या? 



  • मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा

  • कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी 

  • मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या 45 बांधवांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी द्यावी

  • दर दहा वर्षाने आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करावा. सर्व्हे करुन प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्या

  • PHD करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन , त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावं


14 ऑक्टोबरला पार पडलीय मनोज जरांगेंची जाहीर सभा 


जालन्यातील आंतरवाली सराटीत 14 ऑक्टोबरला मनोज जरांगेंची जाहीर सभा पार पडली. जरांगे पाटलांच्या सभेसाठी 150 एकरचं मैदान ठरवण्यात आलं होतं. आदल्या दिवशी रात्रीपासूनच मराठा आंदोलकांची गर्दी आंतरवाली सराटीत झाल्याचं पाहायला मिळत होतं. जाहीर सभेतील भाषणात जरांगेंनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटची आठवण करुन दिली. सरकारला आरक्षण देण्यासाठी 40 दिवसांची मुदत दिली होती, या कालावधीतच मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, जर सरकारनं दिलं नाही दिलं, तर मग चाळीसाव्या दिवशीच सांगू, असा इशाराही भाषणात बोलताना जरांगे पाटलांनी दिला होता. 


पाहा व्हिडीओ : Manoj Jarange Mumbai : मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल, मराठा समाजबांधवांच्या गाठीभेटी घेणार