Manoj Jarange Patil Bombay High Court Hearing : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनासंदर्भात आज (२ सप्टेंबर) पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. मुंबईत निर्माण झालेल्या अस्थिर वातावरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत, न्यायालयाने राज्य सरकारला कडक आदेश दिले आहेत. "आज दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा, सर्व काही सुरळीत झाले पाहिजे, अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई केली जाईल," असा इशारा उच्च न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, या प्रकरणावर पुन्हा एकदा आज दुपारी ३ वाजता पुढील सुनावणी होणार आहे. त्याआधी राज्य सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी स्पष्ट भूमिका न्यायालयाने मांडली आहे. यानंतर आझाद मैदानावरील आंदोलकांनी ठाम भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. आम्हाला गोळ्या घातल्या तरी हटणार नाही, असे पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. 

कोर्टाच्या आजच्या सुनावणीतील 5 मोठे मुद्दे!

1)  तीन वाजेपर्यंत मुंबईतील परिस्थिती सुरळीत करा, राज्य सरकार आणि आंदोलकांना निर्देश.

2)  सरकारच्या भूमिकेने संतुष्ट नाही- कोर्ट

3) मराठा आंदोलकांनी कोर्टाला घेराव घालणं योग्य नाही.

4) आंदोलकांकडे परवानगी नाही तर तात्काळ आझाद मैदान खाली करावं, जागा अडवू शकत नाहीत.

5) तीनपर्यंत कार्यवाही झाली नाही तर कोर्ट स्वत: रस्त्यावर उतरून आढावा घेणार. 

मराठा आंदोलकांनी कोर्टात काय भूमिका मांडली? 

1) आंदोलकांकडून जर त्रास झाला असेल तर माफी मागतो, पण आंदोलकांची कोणतीही सोय झाली नाही.

२) 5 हजार आंदोलनकर्त्यांना परवानगी दिली पण 500 लोकांच्या पार्किंगचीही सोय केली नाही.

३) मीडियाच्या माध्यमातून अतिरिक्त गर्दी वाढल्याची माहिती आंदोलकांना दिली.

४) आम्ही शांत आहोत आम्ही कायद्याचं पालन करतोय.

कोर्टाचे सरकारला आदेश काय?

1) दुपारी तीनपर्यंत सगळं सुरळीत करा, दक्षिण मुंबई रिकामी करा.

2) अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा. 3) कोर्टाचा अवमान केल्यास कारवाई करु.

4) स्थानिकांना शांततेत राहू द्या, लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे ते घराबाहेर पडू शकत नाहीत. 

गोळ्या घातल्या तरी हटणार नाही, आंदोलकांची भूमिका

दरम्यान, कोर्टाच्या आदेशानंतर आझाद मैदानावरील आंदोलकांनी म्हटले आहे की,  जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही एक इंच देखील इथून हटणार नाही. जोपर्यंत आमचे मनोज दादा इथे बसलेले आहे. तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. तीन वाजो, पाच वाजो, कितीही दिवस लागो, जोपर्यंत आमचे दादा इथे आहे तोपर्यंत मराठा बांधव मुंबईतून हटणार नाही. आम्हाला गोळ्या घातल्या तरीही आम्ही हटणार नाही. आम्हाला आरक्षण द्या, आम्ही आमच्या गावी जातो, असे मराठा आंदोलकांनी म्हटले आहे. आता मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आणखी वाचा 

Mumbai Maratha Protest: मुंबई पोलिसांनी आझाद मैदान खाली करण्याची नोटीस देताच मराठा समाजाचा मोठा निर्णय, तातडीने संदेश पाठवले