मुंबई : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे देशात सध्या गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. एकीकडे हॉटेल व्यवसाय यात भरडला जातोय तर दुसरीकडे सामान्यांना देखील गॅस सिलेंडर तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी जैन बांधवांच्या उत्सवासाठी मलबार हिलमधील 16 जैन मंदिरांना प्रत्येकी पाच सिलेंडर उपलब्ध करून देण्याची विनंती करणार पत्र अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना केल्याने वाद निर्माण झाला आहे. आम्ही गिरगावकर संघटनेसह गिरगावातील जवळजवळ सर्वच विरोधी पक्षांनी याचा कडाडून विरोध केला आहे.
इराण युद्धामध्ये राज्यात अनेक ठिकाणी व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे अनेक हॉटेल्स आणि हातगाड्या, खाऊगल्ला बंद असल्याचं चित्र आहे. घरगुती एलपीजी गॅसच्या मुद्द्यावरूनही सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थता आहे. अशा परिस्थितीत मंगल प्रभात लोढा यांनी मात्र जैन मंदिरांसाठी व्यावसायिक गॅसची उपलब्धता करून द्यावं असं पत्रात म्हटलंय.
Mangal Prabhat Lodha Letter : जैन मंदिरांना सिलेंडर द्यावं, लोढांची मागणी
मंगलप्रभात लोढा यांनी राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी मुंबईतील मलबार हिल या परिसरातील 16 जैन मंदिरांना प्रत्येकी पाच व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली आहे.
Amhi Girgaonkar : 'आम्ही गिरगावकर' संघटनेचा विरोध
मंगल प्रभात लोढा यांच्या या मागणीला 'आम्ही गिरगावकर' संघटनेने जोरदार विरोध केल्याचं दिसून येतंय. एकाच समाजाचं फक्त तुम्ही उदोउदो करणार. फक्त निवडणूक आल्यानंतर यांना मराठी मुद्दा आठवतो. लोढांनी फक्त फक्त जैन मंदिरांसाठी गॅसची मागणी केली, इतर मंदिरांसाठीही त्यांनी मागणी करावी. दोन दिवसांपूर्वी राम नवमी झाली. त्यावेळी अनेक ठिकाणी भंडारा झाला नाही. त्यावेळी लोढा यांनी काय केलं? असा सवाल यावेळी नागरिकांनी विचारला.
Mangal Prabhat Lodha Letter On Gas : लोढांच्या पत्रावरुन वाद?
आखाती देशांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याची चर्चा सुरू असताना मुंबईत एलपीजी सिलिंडरवरून पत्रयुद्ध रंगलं आहे. राज्याचे कौशल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या आंबील की ओली या सणासाठी गॅस सिलिंडरची कमतरता भासू नये म्हणून जैन संस्था आणि सोसायट्यांना पत्र लिहिलं. गरज भासल्यास थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
लोढा यांच्या या पत्रावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्षेप घेतला. मनसेनं थेट गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सींना पत्र लिहून सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित केला. तसंच एका विशिष्ट समाजासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप करून, गॅसचा काळाबाजार झाल्यास कठोर भूमिका घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
