मुंबई : महावितरणने आजवर कुठल्याही राजकीय पक्षाच्या जाहीर सभेचे वेळी वीजपुरवठा बंद केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत केलेलं वक्तव्य अत्यंत खेदजनक आहे, अशी प्रतिक्रिया महावितरणने दिली आहे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 12 व्या वर्धापन दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांचा मेळावा शुक्रवारी 9 मार्च वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडला. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर येत्या 18 मार्चला शिवतीर्थावर जाहीर सभा घेणार आहे. त्यावेळी महाराष्ट्रातील वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी वीज घालवली तर त्यांना तुडवा, असं चिथावणीखोर वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं.

यानंतर महावितरणने परिपत्रक काढून स्पष्टीकरण दिलं आणि राज ठाकरेंच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. “मूळात महावितरणने आजवर कधीही आणि कुठल्याही राजकीय सभेचे वेळी जाणीवपूर्वक वीजपुरवठा बंद केलेला नसून याबाबत राज ठाकरेचं हे चिथावणीखोर वक्तव्य अत्यंत खेदजनक आहे,” असं महावितरणने म्हटलं आहे.

‘भाषणावेळी वीज घालवणाऱ्यांना तुडवा’, राज यांचं चिथावणीखोर वक्तव्य

मनसेचा 12 वा वर्धापन दिन, आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा

महावितरणने पुढे म्हटलं आहे की, “महावितरण आजवर कुठल्याही राजकीय पक्षाच्या दबावाला बळी पडलेला नाही. महावितरणचे अधिकारी, अभियंता आणि कर्मचारी हे केवळ आणि केवळ ग्राहक सेवेचे कर्तव्य पार पाडत असतात. कुठल्याही राजकीय पक्षाच्या सांगण्यावरुन वीजपुरवठा बंद पाडण्याची प्रथा किंवा संस्कृती महाराष्ट्रातील महावितरणमध्ये नाही.”

“आज राज्यात सर्वत्र वीजेची उपलब्धता योग्य प्रमाणात असल्याने राज्य भारनियमनमुक्त आहे. अशावेळी वीजपुरवठा बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आज महावितरणचा प्रत्येक कर्मचारी थकबाकी वसुली करण्याच्या कामी लागला असून राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा फायदा राज्यातील काही थकबाकीदार घेण्याची शक्यताच अधिक आहे. त्यामुळे असा प्रकार होणार नाही याची ग्वाहीही राज ठाकरे यांनी देणं आवश्यक आहे.”

उगाच असे चितावणीखोर वक्तव्य करुन महावितरणच्या अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्चीकरणाचा प्रयत्न कुणीही करु नये, असा सल्ला महावितरणने दिला आहे.