Shiv Sena Saamana on BJP : गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडीनंतर राज्याच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. अशात आज सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेनं भाजपवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेनं भाजपवर थेट टीका केली आहे. भाजप हा किती सत्तापिपासू पक्ष आहे आणि त्यासाठी त्यांनी 'महाराष्ट्र रक्षक' शिवसेना फोडली याचा काळा इतिहास लिहिला जाईल. देवेंद्र फडणवीस यांची ही कृती त्यांच्यावरच उलटेल आणि भाजपचा टांगा महाराष्ट्रात पलटेल हे आजचे वातावरण आहे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. 


अग्रलेखात म्हटलं आहे की, हिंदुस्थान तोडून बॅ. जीनाने पाकिस्तान निर्माण केला, पण तो देश राहिला नसून पृथ्वीवरचे एक डबकेच बनला आहे. तशीच अवस्था या बंडखोर वगैरे म्हणवून घेणाऱ्या झाडी-डोंगरातील गटाची होणार आहे. म्हणून ज्यांचा आत्मा आजही जिवंत आहे, त्यांनी त्या डबक्यातून बाहेर पडावे आणि महाराष्ट्राच्या स्वर्गात यावे. गुवाहाटीमध्ये 'झाडी-डोंगर-हाटील' वगैरे आहे, पण महाराष्ट्रात शिवराय आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत. शाहू, फुले, आंबेडकरांची भूमिका आहे. तेव्हा डबक्यातून बाहेर पडा, हे पहिले सांगणे व भाजपने या डबक्यात उडी मारू नये हे दुसरे सांगणे. महाराष्ट्रात विजय भगव्याचाच होईल. पंचावन्नचे एकशे पंचावन्न करण्याची ताकद 'मऱ्हाटी' मनगटात आहे. विचारांचा विजय यालाच म्हणायचे असते, असं लेखात म्हटलं आहे. 


भाजप म्हटलं तर सर्वत्रच आहे, पण कुठेच नाही! त्यांचे काम नारदमुनीप्रमाणे चालते


सामनामध्ये म्हटलं आहे की, शिवसेनेच्या स्थापनेनंतर राजकारणात 280 सेना निर्माण झाल्या. अमुक सेना किंवा तमुक सेना वगैरे, पण गेली 56 वर्षे टिकली ती फक्त शिवसेनाच! गुवाहाटीमध्ये 'डोंगर, झाडी, नदी, हाटील'ची मजा घेत जे आमदार बसले आहेत, त्यांना शिवसेनेच्या या चमत्काराची जाणीव नसेल असे कसे मानायचे? आता कोर्टबाजी सुरू झाली आहे व 'हाटील, डोंगर, झाडी'त बसलेल्या आमदारांवर 11 तारखेपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. हा एक प्रकारे 'दिलासा'च आहे. त्या दिलाशाचे लाभार्थी कोण ते भविष्यात उघड होईलच. विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ यांनी झाडीत बसलेल्या आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे सर्वोच्च न्यायालय म्हणते. म्हणजे विधानसभेचे अधिवेशन 11 जुलैनंतरच घेता येईल. तोपर्यंत आमदारांना 'डोंगर-झाडी-हाटील'मध्येच राहावे लागेल. या सगळ्या परिस्थितीत भाजप नक्की कोठे आहे? भाजप म्हटलं तर सर्वत्रच आहे, पण कुठेच नाही! त्यांचे काम नारदमुनीप्रमाणे चालते. सुधीर मुनगुंटीवारांसारखे नेते विजयाची दोन बोटे नाचवत आपल्या गाडीतून फिरत आहेत. भाजप आपल्या मित्रांचा, सहकारी पक्षांचा 'घास' गिळूनच शांत होतो हे आता झाडीतल्या आमदारांना आणि नेत्यांना लवकरच कळेल. या आमदारांच्या गटास महाशक्तीचा अजगरी विळखा पडला आहे. हा अजगर अख्खा बोकड गिळावा तसे या गटास गिळून पुढे जाईल, असं लेखात म्हटलं आहे.


रावण कितीही बलवान असला तरी विजय प्रभू रामचंद्राचाच होतो


अग्रलेखात पुढं म्हटलं आहे की, सुप्रीम कोर्टाच्या कालच्या निकालानंतर झाडी-डोंगरातील आमदारांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली- 'हा बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय आहे!'' शाब्बास पठ्ठ्य़ा! आनंद दिघे हे एक निष्ठावान, कडवे शिवसैनिक होते आणि बाळासाहेबांचा विचार हाच त्यांचा श्वास व ध्यास होता. जीवनभर त्यांनी कोणत्याही पदाची आस धरली नाही. रंजल्या-गांजल्यांचे ते वाली होते. त्यामुळे त्यांच्या कोणत्या विचारांचा विजय झाला? गद्दारी करणाऱ्यांना विरोध करणारा शिवसैनिक प्रल्हाद सावंत याच्यावर झाडीतल्या आमदारांच्या भाडोत्र्यांनी हल्ला केला हादेखील ठाकरे-दिघेंच्या विचारांचा विजयच समजावा का? शिवसेनेवर होणारे हल्ले परतवून लावण्यासाठी लढणाऱ्या संजय राऊतांवर व्यवस्थित टायमिंग साधून 'ईडी'चे समन्स पाठवले गेले, हासुद्धा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय मानायचा का? आमदार त्या झाडी-झुडुपांतून सांगत आहेत, ''आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्ही कुठे शिवसेना सोडली? राष्ट्रवादीच्या जाचाला कंटाळून आम्ही इथे झाडी-झुडुपांत आलो!'' पण या बोलघेवडय़ांपैकी बहुतेक जण राष्ट्रवादीच्या झुडुपांतूनच शिवसेनेत आले व मंत्री झाले. आता त्यांचे बोल काही असू द्यात. शरद पवारांना ते नेते मानतच होते व ''पवारांसारखा नेता होणे नाही'' असे गौरवोद्गार काढीत होते. मात्र आता त्यांना महाशक्तीच्या अजगरी विळख्याने गिळले व त्यामुळे त्यांना महाराष्ट्राची झाडी-झुडुपे, शिवसेना आवडेनाशी झाली. महाविकास आघाडी नको ना? मग या इथे. माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. नवा डाव मांडू, पण पुन्हा त्याच निष्ठेने काम करणार आहात का? रामाचे नाव घेता व रावणाची कृती करता! शिवसेनेची अयोध्याच जाळायला हे लोक निघाले आहेत. श्रीराम ही मोठीच शक्ती आहे, असं लेखात म्हटलं आहे. रावण कितीही बलवान असला तरी विजय प्रभू रामचंद्राचाच होतो हे महत्त्वाचे. महाराष्ट्राचे मंत्री त्यांची खाती सोडून, आमदार त्यांचे मतदारसंघ सोडून 'झाडी-झुडुपांत' बसले आहेत. याविरोधातही न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांची खाती काढून घेतली, पण हे बिनखात्याचे मंत्री त्यांच्या पदाचा राजीनामा देतील तर शपथ! 11 जुलैपर्यंत या झाडी-झुडुपांतील आमदारांना गुवाहाटीतच राहावे लागेल व उद्या महाराष्ट्रात केंद्रीय सुरक्षा घेऊन परतले तरी उंदरांप्रमाणे बिळातच लपून राहावे लागेल, अशा प्रकारची चीड व संताप महाराष्ट्रीय लोकांत आहे, असं लेखात म्हटलं आहे.