मुंबई : पालघर हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा या मागणीसाठी भाजपचे आमदार राम कदम यांनी मुंबई ते पालघर जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं. परंतु, याआधीच भाजप नेते राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आता राम कदम खार पोलीस ठाण्यातून बाहेर आले आहेत. राम कदम यांच्या निवासस्थानापासून यात्रेला सुरुवात होणार होती. यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.


राम कदम समर्थकांसोबत पालघरच्या दिशेने निघण्यासाठी आपल्या घराबाहेर येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. तसेच राम कदम ज्या गाडीतून प्रवास करत ही यात्रा काढणार होते. ती गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. गाडीवर लावण्यात आलेले काळे झेंडेही पोलिसांनी काढून टाकले आहेत. तसेच त्या परिसरातील कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी हटवलं होतं. राम कदम यांची समजूत काढण्याचाही पोलिसांनी प्रयत्न केला होता. सदर प्रकरणी बोलताना, हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असून दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राम कदम यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.



भाजप नेते राम कदम यांनी पालघर हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा या मागणीसाठी आपल्या निवासस्थानापासून ते पालघरमधील हत्याकांड झालेल्या ठिकाणापर्यंत जनआक्रोश यात्रा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र या यात्रेला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मुंबई पोलिसांनी सकाळपासूनच राम कदम यांच्या निवासस्थानाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा राम कदम यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आला होता. राम कदम यांच्या कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी याठिकाणी होती. यावेळी कार्यकर्त्यांकडून 'भारत माता की जय' अशा घोषणा दिल्या जात होत्या.


दरम्यान, राम कदम निवासस्थानाबाहेर येताच पोलिसांनी त्यांना समजावण्याचाही प्रयत्न केला. परंतु, त्यानंतरही घोषणाबाजी सुरुच राहिली. अशातच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतलं आहे. आता राम कदम यांची सुटका करण्यात आली असून ते खार पोलीस स्थानकातून बाहेर आले आहेत.


काय आहे प्रकरण?


कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी असताना कांदिवली (मुंबई) येथून गुजरात राज्यात आडमार्गाने प्रवेश घेऊ पाहणार्‍या चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (70 वर्ष), सुशिलगिरी महाराज (35 वर्ष), निलेश तेलगडे (30 वर्ष) या तिघांची महाराष्ट्र व दादरा नगरहवेली केंद्रशासित प्रदेशाच्या हद्दीजवळ डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे गावकऱ्यांनी अमानुषपणे मारहाण करून निर्घृणपणे हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी 110 हल्लेखोरांना ताब्यात घेतलं होतं. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आलं होतं. पालघर पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि दोनशे पोलिस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. या प्रकारात अजूनपर्यंत 110 ग्रामस्थांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न आणि इतर कलमे लावण्यात आली आहेत.