मुंबई : झारखंडहून मुंबईला येऊन लोकलमध्ये मोबाईल चोरणाऱ्या टोळीला मध्य रेल्वेच्या लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. तिघा जणांची टोळी भाड्याच्या घरात राहून लोकलमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरायची.


मुकेश कुमार महंतो, इस्तिखार शेख आणि उत्तमकुमार ठाकूर या तिघा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सध्या तरी या तिघांकडून 11 मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत 1 लाख 88 हजार 997 रुपये इतकी आहे.

ठाणे युनिटचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश चोपडे यांना ही टोळी मुंबईत कार्यरत झाल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता.

मस्जिद बंदर भागात पोलिसांनी 2 जुलैला त्यांना पकडलं. यापैकी मुकेशकुमार महंतो हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी पाच गुन्हे दाखल आहेत. त्यानेच इतरांना मोबाईल चोरी करण्याचं प्रशिक्षण दिलं होतं. यांचा आणखी एक साथीदार फरार असून लोहमार्ग पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

ही टोळी मुंबईमध्ये भाड्याने घर विकत घ्यायची. काही दिवस मोबाईल चोरी करुन पुन्हा झारखंडला जायची. चोरलेले मोबाईल पश्चिम बंगालमधील एका मित्राला विकण्यास देऊन त्याद्वारे पैसे कमवायची. पश्चिम बंगालमधून हे फोन बांग्लादेश मध्ये विकले जात असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.