IPL: वानखेडेवरील सामन्यांसाठी पवारांचा मास्टरस्ट्रोक
एबीपी माझा वेब टीम | 12 Apr 2016 04:44 AM (IST)
मुंबई: मुंबई हायकोर्टाच्या दणक्यानंतर वानखेडे स्टेडीयमवरील आयपीएलचे सामने रद्द होतात की काय अशी परिस्थिती असताना, एमसीए अध्यक्ष शरद पवार यांनी मास्टरस्ट्रोक लगावला आहे. वानखेडे स्टेडीयमवरच्या सामन्यांसाठी शरद पवारांनी 'रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब'ला त्यांच्या सांडपाणी प्रक्रिया उद्योगातून पाणी देण्याची विनंती केली आहे. यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेस्टर्न इंडिया क्लबनेही पवारांची विनंती मान्य केली आहे. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सचा ट्रॅक देखरेख, मेन्टेन ठेवण्यासाठी 'रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब' पाणी पुरवतं. मात्र आता रेसिंगचा हंगाम संपत आला आहे. त्यामुळे हे पाणी वानखेडे मैदानासाठी द्यावं, अशी विनंती पवारांनी केली होती. ती 'रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब'ने मान्य केली आहे. यानुसार वानखेडेवरच्या सामन्यांसाठी 7 ते 8 टँकर वेस्टर्न इंडिया क्लब पुरवणार आहे. त्यामुळे वानखेडेवरच्या सामन्यावरचं सावट आता काही काळासाठी तरी दूर झालंय असं म्हणायला हरकत नाही.