मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या पत्रानंतर आता विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.


काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
परमबीर सिंह यांचे पत्र धक्कादायक आणि खळबळजनक आहे. एका डीजी रँकच्या अधिकाऱ्याने असे पत्र गृहमंत्र्यांबद्दल लिहिण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे फडणवीस म्हणाले. या पत्रासोबत एक चॅटही जोडली असून गृहविभागात नियुक्ती किंवा बदलीबद्दल जे काही घडत होते, त्याचा हा कळस असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली. 


..तर हे गंभीर आहे : फडणवीस
मुंबई पोलीस दलाचं खच्चीकरण करणारी, मानहानी करणारी ही घटना आहे. गृहमंत्री पदावर राहिल्यानंतर याची चौकशी कशी होईल? कोणी छोट्या मोठ्या व्यक्तीने लावलेला आरोप नाही. एका डीजी रँकच्या अधिकाऱ्यांनी आरोप केला आहे. पुरावा म्हणून चॅटही सोबत जोडलेलं आहे, तो पुरावाच आहे. परमबीर सिंह यांनी लक्षात आणून दिल्यानंतरही जर मुख्यमंत्री कारवाई करत नसतील तर हे गंभीर आहे. आपलं सरकार वाचवण्यासाठी त्यानी दुर्लक्ष केलं असल्याची गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.


परमबीर सिंह यांचे आरोप काय आहेत?
परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे की, "सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यावर गेल्या काही महिन्यात फंड जमा करण्यासाठी अनेकदा बोलावलं होतं. फेब्रुवारी दरम्यान या भेटी झाल्या. अशा भेटीदरम्यान अनेकदा एक-दोन स्टाफ मेंबर आणि देशमुख यांचे स्वीय सहाय्यक पालांडे देखील तिथे उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिलं होतं. टार्गेट पूर्ण करण्यासाठी जवळपास 1 हजार 750 बार, रेस्टॉरंट आणि मुंबईतील काही बाबींचा समावेश होता. ज्यातून प्रत्येकाकडून 2-3 लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. म्हणजेच महिन्याकाठी 40-50 कोटी रुपये जमा होतील. उर्वरित पैसे हे इतर बाबीतून मिळवता येतील, असं म्हणता येईल."


अनिल देशमुख यांनी आरोप फेटाळले


दरम्यान परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर अनिल देशमुख यांनी हे आरोप फेटाळले आहेत. अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे की, "मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे."