मुंबई : "आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, मात्र पवार साहेबच काय तो अंतिम निर्णय घेतील," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच "बाळासाहेब असते तर कमळाबाईसोबतचे संबंध कधीच तोडले असते," असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला. मुंबईत काल (10 ऑक्टोबर) एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही मतं मांडली.


छगन भुजबळ म्हणाले की, "नाशिकमधील जवळजवळ सगळ्याच कार्यकर्त्यांनी सांगितलं की भुजबळ आम्हाला उमेदवार म्हणून हवे. पण मी निवडणूक लढवणार नाही हे मी एक महिन्यापूर्वीच नाशिकमध्ये जाहीर केलं होतं. कोणी कुठे उभं राहावं, याबद्दल पवारसाहेबांचे आडाखे असतात, त्यांचा एक अभ्यास असतो. काही वेळेला सर्व्हे केला जातो, परिस्थिती पाहिली जाते. शेवटी पक्षप्रमुखाला हे सगळे विचार करावे लागतात. कोणी कुठे काम करावं, कुठल्या पदावर काम करावं. त्याप्रमाणे शरद पवार शेवटचा निर्णय घेतील. तो आम्हा सगळ्यांना मान्य करावा लागेल."

"शिवसेनेने निर्णय घेण्याची वेळ आता आहे. आणखी किती दिवस तळ्यात-मळ्यात करणार. यासाठी निश्चितपणे सीमा आहे. सरकारमध्ये राहून विरोधी भूमिका घ्यायचं, असं होत नसतं. 'सामना'तून टीका होत असते हे आम्ही पाहतो. उद्धव ठाकरेही फार कठोर टीका करत असतात. बाळासाहेब आता असते तर अशी टीका करुन कमळाबाईपासून कधीच फारकत घेतली असती," असा टोलाही भुजबळ यांनी शिवसेनेला लगावला.

पाहा व्हिडीओ