स्थानिकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे पारसिकजवळ मालगाडीचे डबे घसरले
एबीपी माझा वेब टीम | 07 Dec 2017 08:49 PM (IST)
स्थानिकांनी कचरा टाकून तयार केलेल्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये रुळ अक्षरशः गायब झाला आहे.
ठाणे : काल ठाणे-दिव्यादरम्यान पारसिक बोगद्याजवळ मालगाडीचा डबा घसरला आणि कामावरुन घरी परतणाऱ्या लाखो मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला. मात्र कालची दुर्घटना ही रेल्वे रुळावरच्या कचऱ्यामुळे घडल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे रेल्वे रुळाला डम्पिंग ग्राऊंड करणाऱ्यांवर कारवाई कधी करणार, असा सवाल विचारला जात आहे. बुधवारी दुपारी ठाणे-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान पारसिक बोगद्याजवळ मालगाडीचा डबा घसरला आणि मध्य रेल्वे ठप्प झाली. साहजिकच याचा फटका ऑफिसमधून घरी निघालेल्या लाखो मुंबईकरांना बसला. खोळंबलेले प्रवासी रेल्वे प्रशासनाच्या नावानं लाखोल्या वाहत रखडत रखडत घरी पोहोचले. मात्र प्रत्यक्षात मालगाडीचा डबा घसरला तो रेल्वे रुळावर जमा झालेल्या कचऱ्यामुळे.