ठाणे :रस्त्यावर वारंवार पडलेल्या खड्ड्यांमुळे टीकेचे धनी झालेल्या ठाणे महानगर पालिकेने अखेर आपल्या चार अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या चौघांवर आपल्या कामगिरी मध्ये दिरंगाई केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. कालच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलूंड टोल नाका ते घोडबंदर रोड आणि मुंबई-नाशिक हायवेवरील पडघा टोल नाक्या पर्यंत रस्त्यांच्या झालेल्या अवस्थेची पाहणी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर रात्रीच ठाणे महानगरपालिकेने आदेश काढून या चार जणांना निलंबित केले आहे. एबीपी माझा ने केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे पालिकेला अखेर कारवाई करावी लागल्याची प्रतिक्रिया समाज माध्यमांमध्ये उमटत आहे.


गणेशोत्सवापासून ठाण्यात अंतर्गत रस्त्यांप्रमाणेच मुख्य रस्त्यांवर देखील प्रचंड प्रमाणात खड्डे पडल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊन लांबच लांब रांगा लागल्याचे एबीपी माझाने निदर्शनास आणून दिले होते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अडचण निर्माण होऊन ठाण्यात एका तरुणाचा तर भिवंडीत आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना देखील घडली होती. त्यानंतर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना रस्त्यांचा पाहणी दौरा आयोजित करावा लागला होता. या दौऱ्यामध्ये प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी विविध सरकारी संस्थांच्या अधिकाऱ्यची खरडपट्टी देखील काढली होती आणि त्याच वेळी कामात दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.



पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर काल रात्रीच ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्तांनी आदेश काढले. या आदेशामध्ये उठळसर प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता चेतन पटेल, वर्तकनगर प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता प्रकाश खडतरे, लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समितीचे उप अभियंता संदीप सावंत आणि कनिष्ठ अभियंता संदीप गायकवाड अशा चार अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली. या आदेशामध्ये असे देखील म्हटले आहे की, सर्व यंत्रणा असून देखील, निधी उपलब्ध करुन दिला असून देखील, या चौघांनी आपल्या कामामध्ये दिरंगाई केली आणि निष्काळजीपणा केल्यानेच रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मात्र केवळ ठाणे महानगरपालिके नाही तर एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.