मुंबई : शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र विधान परिषदेत असा एक क्षण आला की त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा पहिल्यांदाच साहेब असा उल्लेख केला आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या. उद्धव ठाकरे यांचं विधान परिषदेतील आमदार म्हणून हे शेवटचे अधिवेशन आहे. त्या निमित्ताने निरोपाच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. 

विधान परिषदेतील नऊ सदस्य निवृत्त होत असून त्यांच्या निरोपाच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी सर्वांच्या कार्याचं भरभरून कौतुक केलं. मात्र, त्यामध्ये उद्धव ठाकरेंचं नाव आल्यानंतर सर्वाचे कानही एकनाथ शिंदेंच्या भाषणाकडे लागलं. 

उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरेसाहेब निरोप घेत आहेत. त्यांना निरोगी आयुष्य लाभो. त्यांच्या राजकीय आयुष्याला खूप शुभेच्छा. 

एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या कार्याचं कौतुक केलं. एकनाथ शिंदे म्हणाले की, ठत्या सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्या नाही. उपसभापती पदावर काम करताना न्यायाची भूमिका घेतली. निलम गोऱ्हे या 24 वर्षे सभागृहात आहेत. त्यांचा तोल कधी जात नाही, संयम कधी ढळत नाही. त्यांची विचारधारा पक्की आहे. त्यांनी काल घेतलेल्या निर्णयामुळे ते समोर आले आहे."

अमोल मिटकरींना निरोप देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "अमोल मिटकरी बस नाम ही काफी है,  त्यांचे नाव अमोल आणि वाणी अमोघ आहे.त्यांचा आवाज बुलंद, कणखर आणि झणझणीत आहे. ते विदर्भातील फायरब्रँड नेते आहेत. अजितदादांच्या निधनानंतर मिटकरींचं हळवं रुप आपण पाहिलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत भरभरून बोलणारा वक्ता अमोल मिटकरी आहे. संत साहित्याचा त्याचा चांगला अभ्यास आहे."

रणजित मोहिते पाटील निवृत होतं आहेत. सोलापूर जिल्हा विकासासाठी आपलं काम आहे. विनाकारण संघर्ष अकारण टीका आपल्याकडून कधी दिसली नाही अशा शब्दात एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं. तर शशिकांत शिंदे यांच्याविषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "शशिकांत शिंदे आणि माझा जन्म एकाच मातीतला आहे. सातारची माती लढायला शिकवते. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिवाचं रान करणारा हा गडी. हा मित्रसंपदा मंत्री आहे. शिंदे किसीसे डरते नहीं आणि मैदान छोडके भागते नहीं."