मुंबई : काही युत्या या जनतेच्या विकासासाठी होतात, महायुती ही जनतेच्या विकासासाठी, मुंबईच्या विकासासाठी आहे. पण आता झालेली युती ही सत्तेसाठी आहे. निवडणुका आल्यावरच यांना मराठी माणूस आठवतो असा टोला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे बंधूंना लगावला. युती कुणाचीही कुणाशी झाली तरी आमची महायुती ही महाराष्ट्रामध्ये मजबुतीने उभी आहे. लोकसभा, विधानसभा, नगरपालिकांमध्ये महायुती जिंकली. त्यामुळे अशा सत्तेसाठी झालेल्या युत्यांमुळे काही फरक पडत नाही असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती झाली आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली. मुंबई महापालिकेकडे यांनी सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिली. आता ही कोंबडीच कापून खायचं काम सुरू आहे असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
ठाकरे बंधूंची झालेली युती ही स्वार्थासाठी आणि अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. परंतु जनता त्यांना त्यांची जागा दाखवणार. ठाकरे बंधूंची युती झाली तरीही विठ्ठल आमच्याकडे आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.
Eknath Shinde On Thackeray Yuti : ठाकरेंमुळे मराठी माणूस मुंबईबाहेर
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "यांच्याकडे मुंबईच्या विकासाचा अजेंडा नाही. त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये विकासावर एकही शब्द बोलले नाहीत. यांचा अजेंडा हा फक्त सत्तेसाठी आहे. बाळासाहेबांचा विचार ज्यांनी सोडला त्यांना राज्यातल्या जनतेने त्यांची जागा दाखवली आहे. असली काय आणि नकली काय हे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवलं."
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, "आम्ही विचारधारेला पुढे घेऊन जाणारे आहोत. मुंबईचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यांनी मुंबईसाठी काय केलं हे सांगावं. मुंबईकर हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला तो यांच्यामुळे. या मराठी माणसाला मुंबईत परत आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. त्यांच्या पुनर्विकासाचं काम आम्ही करत आहोत. रमाबाई आंबेडकरनगरमधील 17 हजार घरांचं काम आम्ही मार्गी लावलं आहे. त्यांच्याकडे काय अजेंडा आहे?"
जेव्हा निवडणुका येतात त्यावेळी हे 'मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार' असा बोर्ड लावतात. मुंबईकर सुज्ञ आहेत, त्यांना विकास पाहिजे आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही घेतलेले निर्णय हे मुंबईकरांच्या हितासाठीचे आहेत. पुढच्या सहा महिन्यामध्ये मुंबई खड्डेमुक्त होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ठाकरेंनी कोरोना काळात फक्त पैसाच खाल्ला असा आरोप शिंदे यांनी केला. जे आपली पोरं सांभाळू शकत नाहीत ते राज्य काय सांभाळणार? असा सवालही त्यांनी विचारला.