मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात ईडीची पथकं दाखलं झाली असून शोधमोहीम सुरु आहे. या कारवाई विरोधात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात निषेध करुन भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. "सीबीआय, ईडी काहीही असू द्या, हे सरकार, आमदार आणि नेते कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहित आहे," असं राऊत म्हणाले.


अंमलबजावणी संचालनालयाची पथकं आज सकाळी आठ वाजता शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात पोहोचली आणि शोधमोहीम सुरु केली. मुंबई, ठाणे परिसरातील दहा ठिकाणी ईडीकडून शोध सुरु आहे. टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई केली जात आहे. टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्यांच्या घरी आणि कार्यालयात ही शोधमोहीम सुरु आहे. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. महत्त्वाचं म्हणजे सरनाईक यांच्याव्यतिरिक्त शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


'सुरुवात तुम्ही केली असेल तर शेवट कसा करायचं आम्हाला माहित आहे'
खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या या कारवाईचा निषेध केला. ते म्हणाले की, "सीबीआय, ईडी काहीही असू द्या, हे सरकार, आमदार आणि नेते कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. हे सरकार पुढील चार वर्षेच नाही तर त्यानंतरची 25 वर्षे सत्तेत राहिल. यंत्रणांचा वापर करुन सरकारवर दबाव आणून आणि आमदारांचं मनोधैर्य कमी करु इच्छिणाऱ्यांना लक्षात घ्यावं की हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ही काळ्या दगडावरची रेष समजा, पुढची 25 वर्ष तुमचं सरकार येईल हे स्वप्न विसरुन जा. आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहित आहे.


शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचं पथक दाखल


ईडी किंवा इतर यंत्रणांनी राजकीय पक्षाच्या शाखेप्रमाणे वागू नये
तपास यंत्रणांच्या कारवाईविरोधात संजय राऊत म्हणाले की, "आमच्या प्रत्येक आमदार, खासदारासमोर ईडीने कार्यालय थाटलं तरी आम्ही घाबरणार नाही. ईडी असो किंवा इतर यंत्रणांनी राजकीय पक्षाची शाखा असल्यासारखं काम करु नये. ज्यांचे आदेश ते पाळत आहेत त्या पक्षाच्या 100 जणांची यादी मी पाठवून देतो. त्यांचे काय उद्योगधंदे आहे, मनी लाँड्रिग कशाप्रकारे सुरु आहे, निवडणुकीत कसा पैसा येतो आणि कुठे वापरला जातो, याची माहिती ईडीला नसली तरी आम्हाला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था हे अलिकडच्या सरकारचे गुलाम, चाकर असल्यासारखे वागत असतील तर तुम्ही कितीही नोटीस पाठवा, धाडी टाका, खोटी कागदपत्रे तयार करा, पण या महाराष्ट्र आणि सरकारच्या बाबती विजय सत्याचाच होईल.


प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईचा निषेध व्यक्त करताना संजय राऊत यांनी भाजपला 'शिखंडी'ची उपमा दिली आहे. "ईडीने भाजपच्या कार्यालयातच शाखा उघडली असेल. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. अटक करायची असेल तर करा, नोटीस कसल्या पाठवता, हिंमत असेल घरी या. सरनाईक घरात नसताना त्यांच्या घरात धाड टाकली आहे ही नामर्दानगी आहे. भाजपने सरळ लढावं, शिखंडीसारखं नाही. ईडी किंवा सीबीआयचा वापर करुन, केंद्रीय सत्तेचा वापर करुन लढायचा प्रयत्न करत असेल तर विजय आमचाच आहे," असं शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.


"मानसिक त्रास द्यायचा हे उद्योग तुमच्यावर उलटतील, ती वेळ आली आहे. साम दाम दंड भेदाचं डॉक्टरेट आमच्याकडेही आहे. आमचा जन्मच त्यामधून झाला," असंही राऊत म्हणाले.