Mumbai Rain School College Updates: मुंबई आणि मुंबई उपनगरात रात्रीपासूनच जोरदार पाऊस (Heavy Rain In Mumbai) कोसळत आहे. यामुळे मुंबईच्या अनेक सकळ भागात पाणी साचल्याच पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही सखाल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे.


आज दिवसभर देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (schools and colleges in Mumbai have been declared holiday)


परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय घेणार-


परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. पहिल्या (सकाळच्या )सत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पावसाच्या परीक्षेचा आढावा घेऊन दुसऱ्या सत्रातील म्हणजे दुपारच्या सत्रातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी द्यायची की नाही या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असं मुंबई महानगरपालिका प्रशासनकडून सांगण्यात येत आहे. तसेच नोकरदारांना देखील घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे.


मुंबईतील अनेक भागात साचलं पाणी-


दक्षिण मुंबईतील सायन, हिंदमाता, परळ या भागांमध्ये पाणी साचले आहे. तसेच उपनगरात असल्फा, साकीनाका, जेबी नगर, विक्रोळी, घाटकोपर, चकाला, अंधेरी या परिसरातही सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सध्या साचलेल्या पाण्यातून गाड्यांना मार्ग काढता येत आहे. मात्र, वाहतुकीचा वेग मंदावल्याने रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचून चक्काजाम होण्याची दाट शक्यता आहे. ठाण्यातही आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. 


राज्यात पावसाचा जोर वाढला-


शनिवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कोकण, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस झाला. रविवारी पहाटेपासूनच मुंबईत पावसाला सुरूवात झाली. शहरातील अनेक भागात पावसाची संततधार सुरू असून, पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई लोकल रेल्वे सेवेवरही परिणाम झाला. 


सिंधुदुर्ग, रत्नागिरीत आज शाळांना सुट्टी जाहीर


सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. पुराच्या पाण्यात गाडी घालणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मी दिलेले आहेत. पुराची परिस्थिती अशीच राहील्यास शाळांना सुट्टी देण्यात येईल अशी माहीती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत.


संबंधित बातम्या:


मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन ठप्प! मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली, ट्रान्स-हार्बरचा वेगही मंदावला, अनेक एक्स्प्रेस गाड्याही रद्द


Mumbai Thane Rain Blog LIVE : पावसामुळे मुंबई-ठाण्यातील विविध भागात पाणी साचलं, रेल्वेसेवा विस्कळीत