मुंबई: मुंबईकरांची आगामी काळातील पाणीकपातीचे संकट टळले आहे. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांनी गेल्या आठ वर्षातील उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात 385 दिवस पाणी पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.


गेल्या रविवारपासून परतीच्या पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडविली आहे. पण दुसरीकडे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारे तलाव तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. सध्या मुंबईला धरण क्षेत्रात ३८५ दिवस पुरेल इतका पाणीसाठा साठा जमा झाला आहे.

सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, मध्य वैतरणा धरणे तुडुंब भरली आहेत. तर भातसा आणि मध्य वैतरणा ओसंडून वाहण्याच्या बेतात आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पाणी साठवणुकीची एकूण क्षमता 14.47 लाख दशलक्ष लिटर आहे. पण गेल्या आठ वर्षांमध्ये 2014 चा अपवाद वगळता तलावांनी 14 लाख दशलक्ष लिटरची पातळी ओलांडली नव्हती.

पण यंदा सुरुवातीपासूनच पावसाने जोर धरला, त्यामुळे सातपैकी पाच तलाव ओसंडून वाहू लागले. सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारल्याने तलाव भरतील की नाही अशी परिस्थिती होती. परंतु रविवारपासून कोसळणाऱ्या पावसाने तलावांमध्ये 14.35 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.  हा गेल्या आठ वर्षांतील उच्चांक आहे.