मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन खात्यातील लाचखोरी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांना क्लीन चिट दिली आहे. लाचखोरी प्रकरणात मंत्र्यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही. पुरावे असल्यास एसीबी कारवाई करते असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. अन्न आणि औषध प्रशासनातील कर्मचारी राजू ढेरिंगे याला लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडलं होतं. त्यावरून नरहरी झिरवाळ अडचणीत आले आहेत.

Continues below advertisement

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी अँटी करप्शन ब्युरोला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं आहे. उद्या माझाही कार्यालयात असा कोणी व्यवहार केला तर देखील त्याच्यावर देखील कारवाई होईल. मंत्र्याच्या विरोधात पुरावा असता तर कारवाई झाली असती. कोणतीही कारवाई करण्याआधी एसीबी आधी माहिती घेते. त्यावेळचं संभाषणदेखील रेकॉर्ड केलं जातं, त्याच्या नोंदी घेतल्या जातात. आतापर्यंत समोर आलेल्या गोष्टींमधून मंत्र्यांचं कुठेही नाव आलेलं नाही."

अधिवेशनात मुद्दा गाजण्याची शक्यता

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर औषध आणि प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या विभागातील लाचखोरीचे प्रकरण बाहेर आलं आहे. त्यांची आता चौकशी देखील सुरू आहे. सोमवारपासून  सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर गदारोळ होण्याची शक्यता आहे. मात्र आपल्या विभागातील अधिकाऱ्यांची होत असलेल्या चौकशीत सर्व काही निष्पण होईल, आपण सर्वांना उत्तर देण्यास तयार आहे असं मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केलं आहे.

Continues below advertisement

झिरवाळांच्या खासगी सचिवावर कारवाई

अन्न आणि औषध प्रशासन विभागातील लाचखोरी प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्यावर कारवाई  करण्यात आली आहे. झिरवाळ यांच्या खासगी सचिव रामदास गाडेंना अन्न आणि औषध प्रशासन विभागातून कार्यमुक्त करण्यात आलं आहे. वादग्रस्त अधिकारी रामदास गाडे यांना त्यांच्या मूळ आस्थापनेत म्हणजेच पशुवैद्यकीय विभागात  पाठवण्याचे आदेश नरहरी झिरवळांनी दिले आहेत.