मुंबई : भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकासआघाडी सरकारचा प्रयोग केला. त्यानंतर निवडणुकीत महाविकासआघाडी एकत्र असली पाहिजे अशी भूमिका तिन्ही पक्षाचे नेते घेत असताना महाराष्ट्रात काँग्रेसचे नवे, होऊ घातलेले प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र स्वबळाचा नारा दिला आहे. नाना पटोले हे सध्या विधानसभा अध्यक्ष आहेत.


राज्यात सरकार आल्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद आणि विधिमंडळ पक्षाचे नेते ही दोन्ही पदं आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दुसऱ्या नेत्याला देण्याच्या हालचाली सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले हे काँग्रेर्सचे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची चर्चा आहे. पण, या पदाची जबाबदारी मिळण्याआधी नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या एकत्र येण्याच्या भूमिकेशी विपरीत भूमिका मांडली आहे.

नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्याला पक्ष जी जबाबदारी देईल ती यशस्वी पार पाडून पक्षाला स्वबळावर सत्तेत आणण्याचं काम केलं जाईल, असं विधान केलं आहे.

महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांनी हे सरकार अनेक वर्षे टिकेल असे दावे केले होते. पण, सरकार येऊन एक वर्ष झालं नाही तर काँग्रेस मध्ये स्वबळावर सत्ता येण्याचा नारा आत्ताच देण्यात आला आहे.

Mirzapur Web Series Controversy Exclusive | जाणून घ्या, का सुरु आहे मिर्झापूर विरुद्ध मुंबई पोलिसांतील संघर्ष

आघाडी सरकार चालवताना तारेवरची कसरत सुरू असल्याचे चित्र आहे. त्यात काँग्रेसच्या होऊ घातलेल्या प्रदेशाध्यक्षांनी थेट स्वबळाचा नारा दिला आहे. यामुळे राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस आक्रमक भूमिका घेईल का? आपल्याच मित्र पक्षाविरोधात लढले का? आणि याचा परिणाम महाविकासआघाडी सरकारवर होईल का, हे प्रश्न निर्माण झाले आहेत.