मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पारदर्शी प्रामाणिकतेला मुंबईच्या जनतेने आशीर्वाद दिला, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनेतेचे आभार मानले. महाराष्ट्राने भाजपच्या कामावर मोहोर उमटवली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


मुंबईसह राज्यभरातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाचे कल समोर आल्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री भाजप कार्यकर्त्यांच्या आनंदोत्सवात सहभागी झाले. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेही यावेळी उपस्थित होते.

एखाद्या निवडणुकीत परफॉर्ममन्स चांगला असतो-नसतो. मात्र, राजीनामा मिळाला, तरी तो स्वीकारणार नाही, असे पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले. तर मुंबई महापालिकेत पुढे काय करायचं, याचा निर्णय कोअर कमिटीत घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेत प्रचंड यश मिळालं. पारदर्शी अजेंड्यावर मत मागितलं, त्याला जनतेने समर्थन दिलं. मुंबईत 195 जागा लढलो, 81 जागा मिळाल्या. तर एका जागेवर टाय आहे, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील यशाबद्दल जनतेसह कार्यकर्त्यांचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पारदर्शकतेला मुंबईतील जनतेने आशीर्वाद दिला. नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरु असून, तर नागपूर, अकोला, अमरावती, जळगाव, सोलापूर, नाशिकमध्येही जिंकलो आहोत. महापालिकेच्या 1066 जागांपैकी 521 जागांवर विजय मिळवला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जळगावात एकहाती सत्ता आणली, तर लातूर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातही भाजप पोहोचला. म्हणजेच महाराष्ट्राच्या जनतेने भाजपच्या कामावर मोहोर उमटवली, असे मुख्यमंत्री म्हणाले.