मुंबई : लॉकडाऊनच्या काळात विविध गोष्टींचा पुरवठा खंडित झाला. त्यात औषधांचा देखील समावेश आहे. मात्र अशा परिस्थितीत मध्य रेल्वेने मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीच्या साहाय्याने आठपेक्षा जास्त कॅन्सरच्या रुग्णांना घरपोच औषध पोचवली आहेत. ही औषधे मुंबई डिविजनमधून भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोहोचवण्यात आली आहेत. अशाप्रकारे मध्य रेल्वेने कॅन्सरग्रस्तांचे प्राण वाचवले आहेत.


22 मार्चपासून देशातील रेल्वेसेवा पूर्णतः बंद करण्यात आली होती. मात्र असे असले तरी रेल्वेने मालवाहतूक सुरु ठेवून देशभरात वेगवेगळ्या वस्तूंचा पुरवठा केला होता. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा समावेश सर्वात जास्त होता. मात्र प्रवासी वाहतूक बंद असल्याने नागरिकांना रेल्वेच्या पार्सल सेवेचा वापर करुन एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी वस्तू किंवा इतर गोष्टी पोहोचवायला लागत होत्या. याच पार्सल सेवेचा उपयोग करुन कॅन्सरग्रस्तांसाठी आवश्यक असलेली औषधे मध्य रेल्वेने पोहोचवली आहेत. कॅन्सरची काही औषधे ही मुंबईसारख्या मोठ्या शहरात उपलब्ध असतात. त्यातही काही औषधे ही एका विशिष्ट ठिकाणीच उपलब्ध असतात. मात्र लॉकडाऊन असल्याने ती औषधे विकत घेण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक हे त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हते. अशावेळी मुंबई आणि आसपासच्या शहरातील काही नागरिकांनी मध्य रेल्वेच्या पार्सल सेवेचा वापर करुन देशातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या रुग्णांना औषध पोहोचवली आहेत.


ट्विटरवर आलेल्या ट्विटच्या माध्यमातून या नागरिकांनी मध्य रेल्वेला आपली औषधे पोहोचवण्यासाठी विनंती केली होती. नुकतेच सोलापूर मधल्या एका ब्लड कॅन्सरच्या रुग्णाला 24 तासाच्या आत मुंबईतून घेतलेले औषध मध्य रेल्वेने पोहोचवले होते. त्याच आधारावर बेळगावात असलेल्या दोन रुग्णांना औषध पोहोचवण्यासाठी मुंबईतील त्यांच्या नातेवाईकांनी मध्य रेल्वेला विनंती केली. मात्र बेळगावला जाणारी थेट ट्रेन सध्या उपलब्ध नसल्याने मध्य रेल्वेने ती औषधे मुंबई ते पुणे एका स्पेशल पार्सल ट्रेनने पोचवली. त्यानंतर पुण्यापासून साताऱ्यापर्यंत कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या स्पेशल ट्रेनमधील गार्डने ती औषधे घेऊन जाण्याचे काम केले. पुढे या औषधांचा सातारा ते मिरज हा प्रवास एका श्रमिक स्पेशल ट्रेन मधून झाला. अखेर चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात मिरजपासून बेळगावपर्यंत ही औषधे एकामाल गाडीतून नेण्यात आली. अशाप्रकारे चार वेगवेगळ्या ट्रेनचा प्रवास करुन अखेर त्या रुग्णापर्यंत औषधे पोचवण्यात आली. मध्य रेल्वेच्या मुंबईतील पार्सल इन्स्पेक्टरने ही औषधे पोहोचवण्याची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली.

अशाच प्रकारे कॅन्सरची औषधे मुंबईतून भुवनेश्वर येथील ब्रह्मपूर या गावी राहणाऱ्या एका रुग्णापर्यंत पोहोचवण्यात आली. तसेच कर्नाटकातील बंगळुरु इथे असलेल्या आणि उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे असलेल्या कॅन्सरच्या रुग्णांना अशाचप्रकारे कमीत कमी वेळेत औषध सुपूर्द केली. कोकणातील विनेरे आणि वैभववाडी इथे असलेल्या रुग्णांना देखील मध्य रेल्वेने औषधे पुरवली आहेत.


Covid-19 सारख्या महामारीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंसोबत औषधांचाही तुटवडा भासू नये यासाठी मध्य रेल्वेसह भारतातील वेगवेगळे रेल्वे विभाग दिवस-रात्र कार्यरत आहेत.