Ravindra Waikar News: ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्यात रविंद्र वायकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगेश्वरीमधील (Jogeshwari) सुप्रिमो क्लबच्या जागेचा गैरवापर तसेच, तिथे हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याचा आरोप रविंद्र वायकरांवर करण्यात आला आहे. याचप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र वायकरांसह त्यांची पत्नी आणि इतरांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगेश्वरी भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीनं गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  जोगेश्वरी येथील सुप्रिमो क्लबच्या जागेचा गैरवापर तसेच तिथे हॉटेल बांधताना तथ्य लापवल्याचा आरोप वायकरांवर करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी अधिक सखोल तपास करणार आहे. दरम्यान, रविंद्र वायकरांसह त्यांची पत्नी आणि इतर अशा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


बीएमसीचे उपअभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात रविंद्र वायकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र वायकर, मनीषा वायकर, त्यांचे व्यावसायिक भागीदार आसू नेहलनाई, राज लालचंदानी, पृथ्वीपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरण नेमकं काय? 


रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेनं वायकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. वायकर चौकशीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता वायकरांच्या अडचणीत वाढ झाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर कोविड बॅग घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ झाली होती. आता रविंद्र वायकरांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गट पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. एका पाठोपाठ एक शिवसेना ठाकरे गटासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या ठाकरेंच्या शिलेदारांवर गुन्हे दाखल केले जात आहे. त्यामुळे येत्या काळात नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या अडचणींत वाढ होणार असल्याचं बोललं जात आहे.