Water cut in Mumbai : मुंबईतील काही भागांमध्ये पाणीकपात करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. आज, १२ नोव्हेंबर २०२१ रोजी पवई येथे वैतरणा (२४०० मिली मीटर) आणि उर्ध्व वैतरणा (२७५० मिली मीटर) यामधील ९०० मिली मीटर व्यासाच्या छेद जलजोडणीवर अकस्मात गळती उद्भवली आहे. महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे गळती दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आलेले आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे मलबार हिल, वरळी आणि पाली येथील जलाशयाद्वारे व माहिम येथून होणाऱ्या थेट पाणीपुरवठ्यावर  १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ या दरम्यान परिणाम होणार आहे. या कालावधी दरम्यान नागरिकांनी पाण्याचा वापर जपून व काळजीपूर्वक करावा, असे आवाहनही मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे. 


या परिसरातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम


१. जी दक्षिण विभागः वरळी कोळीवाडा, पोचखानवाला मार्ग, वरळी बीडीडी चाळ, प्रभादेवी, डिलाईल मार्ग, आदर्श नगर, जनता कॉलनी, वरळी हिल मार्ग


२. जी उत्तर विभागः माहिम (पश्चिम), दादर (पश्चिम), प्रभादेवी


३. डी विभागः लेडी लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग (नेपिअन्सी रोड), भुलाभाई देसाई मार्ग, ताडदेव, रीज मार्ग, महालक्ष्मी मंदीर विभाग, एल. डी. रुपारेल मार्ग


४. ए विभागः कुलाबा, न्यू फोर्ट, बॅक बे, मिलेट्री ऍन्ड नेव्ही विभाग, साबू सिद्दीकी


गळती दुरुस्तीच्या कामामुळे या परिसरांमध्ये दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ रोजीसुद्धा कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. तरी संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि सदर कामाच्या कालावधीमध्ये प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.


आणखी वाचा:


मुंबई: मानखुर्दमधील भंगाराच्या गोदामांना आग; कोणतीही जीवितहानी नाही


SSC HSC Exam Fee : दहावी-बारावी परीक्षेची फी भरली 415 रुपये, मात्र परत दिले केवळ 59 रुपये!