मुंबई : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प अंतर्गत दिंडोशी-गोरेगाव-दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान उभारणाऱ्या उड्डाणपुलाचे काम जलदगतीने पूर्ण करावे. अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करून तीन पाळ्यांमध्ये कामकाज करत पूल व पुलाची अनुषंगिक कामे पूर्ण करावीत. जेणेकरून पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला होईल, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी दिले. दादासाहेब फाळके चित्रनगरी येथील बोगदा प्रकल्पाच्या भुयारीकरणासाठी संयंत्र (टनेल बोअरिंग मशीन) ऑगस्ट महिन्यामध्ये दाखल होणार आहे. हे 'टीबीएम' संयंत्र ठेवण्यासाठी चित्रनगरी व्यवस्थापनाकडे भूखंड उपलब्ध करून देण्याकामी विनंती करण्यात आली असून महानगरपालिका अधिका-यांनी त्यासाठी पाठपुरावा करावा, असेदेखील निर्देश श्री. बांगर यांनी दिले.
मुंबई महानगरातील पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता हा सुमारे १२.२० किलोमीटरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यातील कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी आज (दिनांक ६ मार्च २०२५) प्रत्यक्ष पाहणी केली. प्रमुख अभियंता (पुल) श्री. उत्तम श्रोते यावेळी उपस्थित होते.
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प अंतर्गत दिंडोशी-गोरेगाव-दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान सहा पदरी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. याची उंची १, २६५ मीटर आहे. उड्डाणपुलासाठी बॉक्स गर्डर व उच्चस्तरीय काँक्रिटचा वापर केला जात आहे. तसेच, रस्ता ओलांडण्याकरिता पादचारी पूल, स्वयंचलित सरकता जिन्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. रत्नागिरी जंक्शन येथे उड्डाणपुलाला आधार देणारे ४ उभे खांब (पिअर्स) वगळता उर्वरित काम अंतिम टप्प्यात आले आहे. रत्नागिरी जंक्शन येथील संरचनात्मक अंमलबजावणी पद्धती कशी असावी याबाबत सल्लागार यांच्यासमवेत श्री.बांगर यांनी विचारविनिमय केला. तसेच, भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) अभिप्रायानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतरच प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाईल, असेदेखील श्री. बांगर यांनी स्पष्ट केले.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. बांगर म्हणाले की, सध्याच्या नियोजनानुसार, पूलाच्या बांधकामास ९ महिन्यांच्या कालावधी लागणार आहे. दरम्यानच्या काळात रत्नागिरी जंक्शनच्या दोन्ही बाजूस खांब उभारणी, दोन आधारस्तंभ (पिअर्स) यांच्यामधील अंतराचे (स्पॅन) काम आणि अनुषंगिक कामे पूर्ण करावीत, जेणेकरून पूल वाहतुकीस लवकरात लवकर खुला करता येईल. त्यासाठी कालमर्यादा दर्शविणाऱया स्तंभांच्या स्वरूपात आलेख (बार चार्ट) तयार करावा. अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करून तीन पाळ्यांमध्ये कामकाज करावे. एकाचवेळी एकापेक्षा अधिक चमू (टीम्स्) कार्यरत राहील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश श्री. बांगर यांनी दिले.
जोड रस्ता प्रकल्प अंतर्गत पश्चिम उपनगरांमध्ये गोरेगाव स्थित दादासाहेब फाळके चित्रनगरी ते पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड येथे खिंडीपाडापर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्यात येणार आहे. एकमेकांना समांतर असे हे जुळे बोगदे प्रत्येकी ४.७० किलोमीटरचे असतील. हा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याच्या डोंगराच्या खाली पूर्णपणे जमिनीखालून जाणार आहे. या भूमिगत बोगद्यामध्ये शिरण्यासाठी चित्रनगरी परिसरामध्ये पेटी बोगदा देखील बांधण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या कामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेवून तो पूर्ण करण्यात येत आहे.
भुयारीकरणासाठी साधारणत: २०० मीटर (लांबी) बाय ३० मीटर (रूंद) बाय ३८ मीटर (खोली) च्या लॉन्चिंग शॉफ्टचे काम सुरू आहे.त्याच्या 'पायलिंग' कामाची पाहणी देखील अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. बांगर यांनी केली.भुयारीकरणासाठी टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) ऑगस्ट महिन्यात दाखल होणार आहे. हे 'टीबीएम' संयंत्र ठेवण्यासाठी चित्रनगरी व्यवस्थापन जोश मैदान, वेलकम मैदान, साई मैदान उपलब्ध करून देणार आहे. स्थानिक महानगरपालिका अधिका-यांनी मैदान उपलब्धतेसाठी चित्रनगरी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करावा, असेदेखील निर्देश श्री. बांगर यांनी दिले. चित्रनगरी अंतर्गत विद्यमान रस्त्यालगत पर्यायी रस्ता विकसित केला जात आहे, त्याची पाहणीदेखील श्री. बांगर यांनी केली.