मुंबई : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांची क्रिस्टल कंपनी वादात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. याच टीकेला आता प्रसाद लाड यांनीही उत्तर दिलं आहे.


 


'मानव तस्करी करुनही फक्त भाजपात आहेत म्हणून प्रसाद लाड पावन झाले का?' असा सवाल उपस्थित करत सुप्रिया सुळे यांनी लाड यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांवरही टीका केली आहे.

त्यांच्या या टीकेवर आमदार प्रसाद लाड यांनीही सुप्रिया सुळेंना उत्तर दिलं आहे. 'मी राष्ट्रवादीमध्ये असल्यापासून बिझनेसमध्ये होतो. त्यामुले ताईंनी माझ्यावर टीका करण्याआधी शहानिशा करणं अपेक्षित होतं.' असं ते यावेळी म्हणाले.

प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले?

पवार साहेब नेहमी सांगायचे आरोप झाले की तो माणूस मोठा होतो : प्रसाद लाड

‘खासदार सुप्रिया ताईंनी केलेल्या ट्वीटबद्दल मला अतिशय दुःख झालं. मी राष्ट्रवादीमध्ये होतो तेव्हापासून बिझनेसमध्ये आहे. जेव्हा मी त्यांच्या पक्षात होतो तेव्हा हाच व्यवसाय करत होतो. त्यामुळे ताईंनी माझ्यावर टीका करण्याआधी त्याची शहानिशा करणं अपेक्षित होतं. त्यांनी संबंधितांकडून नीट माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. पवार साहेब मला नेहमी सांगायचे ‘आरोप झाले की तो माणूस मोठा होतो.’ ताईंनी ट्विट केल्यामुळे माझा राजकीय भाव वाढला. राष्ट्रवादीने माझा धसका घेतला आहे.’ असं थेट उत्तर प्रसाद लाड यांनी दिलं आहे.

दरम्यान, प्रसाद लाड यांच्या या प्रतिक्रियेनंतर सुप्रिया सुळे आता काय उत्तर  देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.