मुंबई : आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईकरांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील बेस्टचे 30 हजार कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे मुंबईतील बेस्ट बसची वाहतूक ठप्प झाली आहे.


वेतनवाढ, वेतननिश्चिती तसेच बेस्टच्या अर्थसंकल्पाचे महापालिका 'अ' अर्थसंकल्पात विलिनीकरण यांसारख्या प्रमुख मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. संप टाळण्यासाठी बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कामगार संघटना यांच्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ही बैठक निष्फळ ठरली. या बैठकीला बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनीच हजेरी लावली नाही.


लोकल रेल्वेनंतर 'बेस्ट' बस हा मुंबईकरांच्या प्रवासाचा दुसरा मोठा पर्याय आहे. मात्र गेली अनेक वर्ष बेस्ट संकटात आहे. बेस्टला मुंबई महापालिकेकडून आश्वासनं मिळतात पण ती पूर्ण होताना दिसत नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा बेस्टला आश्वासन दिलं होतं ते ही पूर्ण केलं नाही. त्यामुळे कामगारांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं.


बेस्टचा संप, टॅक्सीचालकांची मुजोरी


बेस्ट संपाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत टॅक्सीचालकांची मुजोरी पाहायला मिळत आहेत. टॅक्सीचालक प्रवाशांकडून चौपट दर वसूल करत आहेत. मीटर किंवा शेअर टॅक्सीच्या दरांऐवजी प्रतिप्रवासी भाडे आकारणी करुन मुंबईकरांची पिळवणूक सुरु आहे. भायखळा ते जेजे ब्रीज या एक ते दीड किमी अंतरासाठी तब्बल 80 रुपये भाडं आकारलं जात आहे. शिवाय खाजगी बसही जादा पैसे प्रवाशांकडून घेत आहेत. त्यामुळे अनेकजण जवळच्या प्रवासासाठी लिफ्ट घेऊन प्रवास करत आहेत.

बेस्ट संपाच्या पार्श्वभूमीवर एसटी मुंबईकरांच्या मदतीला

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीने सकाळपासून 40 बस रस्त्यावर उतरवल्या आहेत.

कुर्ला पश्चिम ते बांद्रा - 05 बस

कुर्ला पूर्व ते चेंबूर - 05 बस

दादर ते मंत्रालय - 05 बस

पनवेल ते मंत्रालय - 05 बस

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंत्रालय - 05 बस

ठाणे ते  मंत्रालय - 15 बस

अशा एकूण 40 बस सध्या रस्त्यावर धावत आहेत, गरजेनुसार आणखी जादा बस सोडण्यात येतील, असं एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.