Baba Siddique shot dead in Mumbai : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांचे (NCP) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. जखमी अवस्थेत त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले होते. पण त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. हा हल्ला झाला तेव्हा सिद्दीकी निर्मल नगर भागातील आपल्या कार्यालयातून निघून गाडीत बसले होते. त्यावेळी हल्लेखोरांनी लपून त्यांच्यावर गोळीबार केला. पण आता मोठी बातमी म्हणजे बाबा सिद्दिकी हत्येचे पुणे कनेक्शन समोर आले आहे. तिन्ही आरोपींना पुण्यातून बोलवल्याचा संशय वक्त केल्या जात आहे.


तिन्ही आरोपींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर जवळपास सहा गोळ्या झाडल्या सांगण्यात येत आहे. एक आरोपी हा हरियाणातील आहे तर दुसरा आरोपी हा उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती आता समोर आली आहे. तिघांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सिद्दिकी यांच्या हत्येमागे एका बड्या गँगस्टरचा हात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामागे सलमान खान कनेक्शन असून बिश्नोई गँगचा त्यामागे हात असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.



उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले असून ते मध्यरात्री मुंबईत परतणार आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी लीलावती रुग्णालयात पोहोचले. "माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचे निधन झाल्याचे समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी राज्यमंत्री बाबत सिद्दिकी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली."


शिवसेनेचे (यूबीटी) प्रवक्ते आनंद दुबे म्हणाले की, आमच्या मुंबई शहरात माजी आमदार सुरक्षित नाहीत, सरकारी नेते सुरक्षित नाहीत, मग हे सरकार सर्वसामान्यांचे संरक्षण कसे करणार? आपल्या आमदार आणि माजी मंत्र्यांना सुरक्षित ठेवता येत नसेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. त्यांना गृहमंत्री राहण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री राहण्याचा अधिकार नाही. मुंबईच्या रस्त्यांवर भरदिवसा गोळीबार होत आहे. गोळीबाराच्या तीन राउंड होत आहेत आणि लोकांवर गोळ्या झाडल्या जात आहेत... ही कायदा आणि सुव्यवस्था आहे का? गुन्हेगारांना भीती नाही. महायुती आणि भाजपच्या धोरणांमुळे राजकारण बदनाम झाले आहे.