मुंबई : मुलुंड टोलनाका (Mulund Toll) तोडफोडप्रकरणी मनसे (MNS) कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली आहे. अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यासह 12 कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली आहे.  पोलिसांकडून सुटका झाल्यानंतर अविनाश जाधव यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेण्यासाठी मनसे तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता गांधीगिरी आंदोलन केले मात्र यापुढे आता गांधीगिरी आंदोलन होणार नाही, मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा अविनाश जाधव यांनी  दिला आहे.


 अविनाश जाधव यांच्यासह दहा ते बारा कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर नवघर पोलीस ठाण्यात बाळा नांदगावकर ,संदीप देशपांडे, अभिजीत पानसे,रिटाताई गुप्ता यांनी पोलीस ठाण्यात पोलिसांशी संवाद साधत कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. राज ठाकरे यांचे विधीतज्ञ मुंबई उच्च न्यायालयाचे वकील राजन शिरोडकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची जामीन प्रक्रिया पूर्ण करून कार्यकर्त्यांची सुटका केली


पक्षाकडून सूचना येत नाही तोपर्यंत कुठलीही भूमिका घेऊ नये


अविनाश जाधव यांनी स्पष्ट केले आहे की गांधीगिरी मार्गाने यापुढे आंदोलन होणार नाही मात्र मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत टोल आंदोलनासंदर्भात पक्षाकडून सूचना येत नाही तोपर्यंत कुठलीही भूमिका घेऊ नये, अशी सूचना देण्यात आली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच या सूचना मनसैनिकांना दिल्या असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आलीये. 


टोल जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोशन वाडकरला आज मुलुंड कोर्टात हजर करणार


मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुलुंड चेक नाक्याजवळ देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी चर्चा केलेला व्हिडीओ वाहन चालकांना दाखवून टोल न भरण्याची विनंती केली. त्यांच्यासोबत तीन कार्यकर्ते होते हे सर्वजण वाहन चालकांना व्हिडीओ दाखवून टोलमुक्ती बाबतची जनजागृती करत होते. मात्र मुलुंड नवघर पोलिसांनी ऐरोली मुलुंड ठाणे या परिसरातील कार्यकर्त्यांची धरपकड केली आणि त्यांना अटक देखील केली.  रात्री 12 नंतर कार्यकर्त्यांची सुटका केली असून टोल जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोशन वाडकर या कार्यकर्त्याला मुलुंड कोर्टात  हजर करणार आहेत. 


मनसैनिकांची पोलिसांसोबत बाचाबाची


आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील, देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.. राज ठाकरेंच्या याच इशाराऱ्यानंतर मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या प्रत्येक टोलनाक्यावर मनसैनिक हजर झाले. ठाणे, नवी मुंबईतील टोलनाक्यांवरुन मनसैनिकांनी हलक्या वाहनांना विनाटोल सोडण्यास सुरुवात केली. यावेळी मनसैनिकांची पोलिसांसोबत बाचाबाचीही झाली.   


हे ही वाचा :


Raj Thackeray : '...तोपर्यंत कोणतीही भूमिका घेऊ नये', पक्षाकडून मनसैनिकांना सूचना