Maharashtra Weather Updates: पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासाठी पुढील 3-4 तास महत्त्वाचे, वारे वेगाने वाहणार, पावसाची शक्यता
Maharashtra Politics: मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण परिसरात आजदेखील वेगाने वारे वाहण्याची शक्यता. मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज. कोकण परिसरात मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तीन-चार तासांत वातावरण बदलणार

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये वादळी वारे आणि पाऊस बरसताना दिसत आहेत. सोमवारी संध्याकाळी मुंबई शहर, उपनगर, ठाणे, डोंबिवली, बदलापूर, नवी मुंबई या भागांना वळीवाच्या पावसाने (Maharashtra Rain) अक्षरश: झोडपून काढले होते. अवघ्या तासाभरात वादळी वारे आणि जोरदार पावसाने मुंबईतील वाहतूक व्यवस्थेची घडी विस्कटून टाकली होती. संध्याकाळच्या वेळेत पावसाने धिंगाणा घातल्याने घरी निघालेल्या चाकरमन्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर आता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने (Weather Forecast) मंगळवारी राज्यात कसे वातावरण राहील, याबाबत अंदाज जाहीर केला आहे. त्यामध्ये राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने कोकण परिसरात मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मात्र, दुपारनंतर राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. कोकणात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. येत्या तीन ते चार तासांमध्ये ठाणे, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर आणि रायगडातील काही भागात वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. या भागात जवळपास 40 ते 50किमी प्रतितास इतक्या वेगाने वारे वाहतील. त्याचसोबतच या सर्व परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो, अशी माहिती हवामान खात्याने दिली.
हवामान खात्याकडून प्रवाशांना खबरदारीचे आवाहन
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार मंगळवारी संध्याकाळी पुन्हा पाऊस झाल्यास रेल्वे वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. अगदी थोड्या पावसानेही मध्य रेल्वे ठप्प होते, असा लौकिक आहे. त्यामुळे आजदेखील मुंबईतील चाकरमान्यांना घरी जाताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कालच्या तुलनेत आज वाऱ्याचा वेग कमी राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. परंतु, वाऱ्यांचा वेग हा नेहमीपेक्षा जास्त असेल, तसेच पाऊसही असेल. त्यामुळे प्रवाशांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
वादळी वाऱ्यांमुळे पडझड
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या परिसरात सोमवारी जोरदार वारे वाहत होते. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 100 च्या पुढे पोहोचला होता. त्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पडझडीच्या घटना घडल्या होत्या. घाटकोपर परिसरात वेगवान वाऱ्यांमुळे महाकाय होर्डिंग जमीनदोस्त झाले होते. या होर्डिंगच्या खाली अनेकजण दाबले गेले होते. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला होता.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
