नागपूर : एसटी संपाचे नेते अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना संघाच्या मुंबईतील विजयादशमीच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आलं आहे. अॅड. सदावर्ते यांंना संघाच्या कार्यक्रमासाठी देण्यात आलेल्या निमंत्रणामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.


मुंबईतील परळ, नायगाव, शिवडी या परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ता हे उदय कुलकर्णी हे असतील. तर प्रमुख अतिथी हे अॅड. गुणरत्न सदावर्ते हे असतील. 




राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) यंदाचा विजयादशमी कार्यक्रम विशेष असणार आहे. आरएसएसच्या मुंबईतील विजयादशमीच्या एका कार्यक्रमाला अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मुख्य अतिथी म्हणून बोलावण्यात आलं आहे. विजयादशमी निमित्ताने होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाकडे सर्वांचंच लक्ष असतं. या दिवशी विविध ठिकाणी कार्यक्रमांच आयोजन केलं जातं. 


सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप घडवला 


राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी रान उठवलं होतं. अॅड. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य कराव्यात यासाठी त्यांनी मोठा संप घडवून आणला होता. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्यानंतरही त्यांनी यासाठी लढा सुरुच ठेवला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या घरावर सदावर्ते यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याची घटना घडली होती.


नथुराम गोडसेचे कौतुक करत गांधीजींवर टीका 


अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी 'एसटी कष्टकरी जनसंघ' या संघटनेची स्थापना केली आहे. अॅड. सदावर्ते यांनी या संघटनेच्या स्थापनेवेळी जय श्रीराम अशी घोषणा दिली होती. महात्मा गांधी यांची हत्या केलेल्या नथुराम गोडसे याच्या नावाचा त्यांनी 'गोडसेजी' असा उल्लेख केला होता. नथुराम गोडसे याचे कौतुक करताना ते म्हणाले होते की, "गांधीजींनी शेवटच्या क्षणी 'हे राम' म्हटलं होतं असं इतिहासात लिहिलं आहे. परंतु नथुराम गोडसे यांची कोर्टात ट्रायल झाली त्यावेळी गोडसेजी यांनी स्पष्ट केलं होतं की महात्मा गांधी यांनी श्वास सोडताना कधीही 'हे राम' म्हटल नव्हतं."


गांधीवादाने देशाची फसवणूक केल्याचा आरोप अॅड. सदावर्तेंनी केला होता. देशात एक मोठं षडयंत्र रचण्याचा प्रयत्न गांधीवादी राजकारण्यांकडून करण्यात येत असल्याचंही त्यांनी या आधी वक्तव्य केलं आहे.


भाजप नेत्यांशी जवळीक 


अॅड गुणरत्न सदावर्ते यांची भाजपच्या प्रमुख नेत्यांशी विशेष जवळीक असल्याची चर्चा आहे. एसटी कर्मचारी आंदोलनामध्ये भाजपच्या काही नेत्यांकडून त्यांना पडद्याआडून रसद पुरवल्याचं सांगितलं जातंय. 


नागपुरात संघाचा विजयादशमी मेळावा 


दसऱ्याच्या निमित्ताने नागपुरात होणाऱ्या आरएसएसच्या कार्यक्रमाला विजयादशमी उत्सव असं म्हटलं जातं. संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराच्या समोरील रेशीम बाग मैदानावर हा मेळावा पार पडतो. पहाटे संघाचे स्वयंसेवक शिस्तबद्ध पद्धतीने रेशीमबागपासून पथसंचलन करतात. त्यानंतर स्वयंसेवक रेशीम बाग मैदानावर शारीरिक कवायती आणि कसरतींचे प्रात्यक्षिक करतात. यंदाच्या कार्यक्रमासाठी पहिली भारतीय महिला एवरेस्ट वीर असलेल्या संतोष यादव (Santosh Yadav) यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आलं आहे.