मुंबई : पब्जी ऑनलाईन गेम बंद करा, अशी मागणी 11 वर्षीय मुलाने राज्य सरकारला केली आहे. या मुलाने यासंदर्भात राज्य सरकार, केंद्रीय विधी व न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहिलं आहे. पब्जी गेममुळे हिंसेला प्रोत्साहन मिळत असल्याचा दावा या मुलाने पत्रात केला आहे.


अहाद निझाम असं संबंधित मुलाचं नाव असून तो मुंबईमधल्या वांद्र्यातील आर्य विद्यामंदिर या शाळेत शिकतो. यासंदर्भात न्यायालयात पीआयएल दाखल करणार असल्याचंही त्याने पत्रात म्हटलं आहे.

आपल्या चार पानांच्या पत्रात अहाद म्हणतो की, "प्लेयर्स अननोन बॅटलग्राऊंड (PUBG) या ऑनलाईन खेळामुळे हिंसेला प्रोत्साहन मिळत असून हत्या, आक्रमकता, व्यसन या गोष्टी समोर येत आहेत. हा खेळ बंद केला नाही तर मी कायदेशीर प्रक्रिया करणार आहे."

दरम्यान, पब्जीचं वेड दिवसेंदिवस वाढतच जात आहे. पब्जी खेळण्याची इतकी आवड का, हे पब्जी खेळणारे तरुण उत्साहाने सांगतात. कोणाला एकाग्रता वाढवण्याचा हा मार्ग वाटतो, तर कोणाला पब्जीमुळे मानसिक तणाव कमी होत असल्याचं वाटतं.

पब्जी हा आता गेम राहिलेला नाही, तर हे व्यसन झालेलं आहे. तसं ऑनलाईन गेम्सचं फॅड काही आजचं नाही. आधी तो फार्मविल होता, कधी तो 'पोकेमॉन गो' झाला, तर आता पब्जी. त्यामुळे आपला मुलगा गेम्सच्या व्यसनाच्या आहारी जाऊ नये याची काळजी पालकांनी वेळीच घेतलेली बरी. नाहीतर आयुष्याच्या बॅटलग्राऊण्डवर नॉक ऑऊट व्हायला वेळ लागणार नाही.