पानिपत : 14 जानेवारी म्हणजे संक्रांत असं समीकरण असलं तरी महाराष्ट्राच्या इतिहासासाठी या दिवसाची आणखी एक ओळख आहे. 14 जानेवारी 1761 याच दिवशी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात अहमद शहा अब्दालीसारख्या परकीयाचं आक्रमण रोखण्यासाठी मराठ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली होती. पानिपतमधील 'काला अंब' परिसरात मराठ्यांनी रक्ताचे पाट वाहत परकीय आक्रमकांना रोहून धरत या देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं. आजही या मराठ्यांच्या शौर्याच्या आणि पराक्रमाची साक्ष इथली माती देते. 

अशातच, पानिपतावरील रणांगणावर धारतीर्थी पडलेल्या असंख्य ज्ञात- अज्ञात मावळ्यांना स्मरून काला अंब परिसरात मराठा शौर्य स्मारक उभारण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठ्यांच्या या त्याग आणि बलिदानातून येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळत राहावी या अनुषंगाने 'काला अंब' परिसरात 'मराठा शौर्य स्मारक' उभारण्यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे.

 हरियाणा सरकारसोबत समन्वय, पर्यटन विभागामार्फत निधी  

पुढे आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकार काला अंब स्मारकाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेली जमीन अधिग्रहण करणार असून त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून निधी देखील प्रदान करणार असल्याची माहिती पुढे आली आहे.याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सरकारकडून उभारला जाणार आहे. सोबतच संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम आणि इतर आवश्यक कार्यक्रम संदर्भात सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. हरियाणा सरकारसोबत समन्वय साधण्यासाठी मंत्री जयकुमार रावल समन्वयक म्हणून कार्यरत असणार आहे. तर पर्यटन विभागामार्फत देखील यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मुख्यमंत्र्यांकडून पानिपतच्या तिसऱ्या लढाईला 264 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मराठा शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मुख्यमंत्र्यांकडून घोषणा करण्यात आली होती. दरम्यान त्या कामाला आता वेग आला असल्याचे बोललं जातंय. 

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

-' काला अंब' स्मारकाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेली जमीन अधिग्रहण करेल, त्यासाठी महाराष्ट्र शासन निधी प्रदान करेल. 

- या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा महाराष्ट्र शासनाकडून उभारण्यात येईल, तसेच मराठा शौर्याचे प्रतीक असणारे भव्य संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम आणि इतर आवश्यक त्या कार्यक्रम सुविधा निर्माण करण्यात येतील.

- हरियाणा राज्य सरकारशी समन्वय साधण्यासाठी,  जयकुमार रावल, मंत्री (राजशिष्टाचार व पणन) हे समन्वयक म्हणून कार्यरत राहतील.

- या प्रकल्पाकरीता जमीन अधिग्रहण आणि तद्‌नुषंगिक इतर बाबीकरीता पर्यटन विभाग "नोडल विभाग" म्हणून कार्यवाही करेल. त्याअतंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे - कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून कार्यरत राहतील.

- या शौर्य स्मारकामध्ये मराठा साम्राज्याच्या जाज्वल्य इतिहासाचा योग्य तो परिणाम साधण्यासाठी विभागामार्फत आवश्यक ते उपक्रम राबविण्यात येईल.

- पर्यटन विभाग या प्रकल्पाकरीता आवश्यक त्या निधीची तरतूद करेल.

- विभागामार्फत निर्माण करण्यात येणा-या मराठा शौर्य स्मारक आणि इतर बाबीकरिता मा. पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ञांची/जाणकारांची वेगळयाने समिती निर्माण करण्यात येईल. 

हे ही वाचा